मुंबई: ज्येष्ठ झुंझार पत्रकार अभय मोकाशी यांच्या निधनानंतर आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेत त्यांचे बंधू संदेश मोकाशी यांनी सांगितलेली हकीकत उपस्थितांच्या अंगावर शहारे आणणारी ठरली. कर्करोगाशी लढताना अभय मोकाशी यांनी दाखवलेला संयम आणि लढाऊ बाणा खऱ्या अर्थाने प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तर मुंबई पत्रकार संघातर्फे मुंबई वैश्य समाजाच्या सदडेकर सभागृहात आयोजित या शोकसभेत संदेश मोकाशी म्हणाले की, “अभय केवळ कर्करोगाशीच लढत नव्हते, तर मृत्यूशी झुंज देताना ते तब्बल ७० दिवस अन्न-पाण्यावाचून राहिले. हा संयम, योगसाधनेची शक्ती आणि जगण्याची जिद्द सामान्यांना अवाक करणारी आहे. त्यांच्या जीवनपद्धतीचे अनुकरण करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.”
यावेळी अभय मोकाशी यांच्या व्यक्तिमत्त्वातील सत्याचा आग्रह, कुटुंबाप्रती बांधिलकी आणि लढवय्येपणा या गुणांचे उपस्थितांनी स्मरण केले. उत्तर मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष विनायक घोडे यांनी अभय यांच्या परखड व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून दिला. यावेळी डॉ. सुकृत खांडेकर, प्रसाद मोकाशी, शुभांगी सारस्वत, सुभाष सूर्यवंशी आणि विजय तारी यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
डॉ. अभय मोकाशी यांच्या नावाने पुरस्कार जाहीर
युनायटेड नेशन्सचे पीस ॲम्बेसेडर डॉ. प्रवीण भाटिया यांनी यावेळी मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितले की, साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी आणि संबंधित संस्थांतर्फे ‘डॉ. अभय मोकाशी उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार’ सुरू करण्यात येणार असून, त्याची निवड उत्तर मुंबई पत्रकार संघाद्वारे केली जाईल. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार आणि अभय मोकाशी यांचे निकटवर्तीय उपस्थित होते.

