मुंबई
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे यांची चौकशी विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे एसआयटी पथक अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे.
दिशा सालियन प्रकरणी काही आमदार ठाकरेंकडे चौकशीची मागणी करत होते. नागपूरच्या गेल्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते.
दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे त्यावेळी कुठे होते? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआयटीच्या या तपासात अनेक पुरावे समोर आले आहेत, ज्यांच्या आधारे आता आदित्य ठाकरे यांची चौकशी होऊ शकते. आज गुरुवारी सायंकाळपर्यंत राज्य सरकारकडून विशेष तपास पथकाबाबत घोषणा केली जाऊ शकते.
गेल्या अनेक महिन्यांपासून दिशा सालियन मृत्यू प्रकरण राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला असून यावरुन अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. भाजप आमदारांकडून सातत्याने या प्रकरणात आदित्य ठाकरेंविरोधात आरोप केले जात आहेत. भाजप नेते नारायण राणे आणि नितेश राणे यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. मध्यंतरी दिशा सालियन हिच्या पालकांनी राणेंविरोधात बदनामीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नारायण राणे यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं होतं.