मुंबई
सोयाबीन-कापसाच्या प्रश्नावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रविकांत तुपकरांची मुंबईत बैठक झाली.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात नुकतीच ही बैठक संपली असून रात्री साठेआठ ते दहा या दीडतासाच्या जम्बो बैठकीत सोयाबीन-कापूस प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. बैठकीत सोयाबीन-कापूस प्रश्न केंद्राकडे मांडतांना तुपकरांना उपमुख्यमंत्री फडणवीसांची खंबीर साथ दिली.
या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
- सोयाबीन दरवाढीसाठी पामतेलावर आयात शुल्क लावणार,यावर्षी सोयापेंड आयात करणार नाही व सोयापेंड निर्यातीला केंद्र सरकार प्रोत्साहन देणार यासंदर्भात तातडीने निर्णय घेण्याचे वाणिज्य मंत्री गोयलांचे तुपकरांना ठोस आश्वासन.
- कापूस दरवाढीसाठी केंद्रीय कृषीमंत्री व संबंधित यंत्रणांसोबत चर्चा करून ठोस निर्णय घेण्याचा शब्दही गोयलांनी तुपकरांना दिला.
- खाद्यतेलामध्ये पामतेल मिक्स करण्यावर बंदी घालण्याची आग्रही मागणी या बैठकीत तुपकरांनी केली.
- सोयाबीन-कापसाचे धोरण ठरविण्यासाठी कायमस्वरूपी अभ्यासगट स्थापन करून वर्षातून दोन बैठका घेण्याची मागणी देखील रविकांत तुपकरांनी केली.
- वस्त्रोद्योगाला सॉफ्टलोन देण्याची मागणीही तुपकरांनी लावून धरली.
- या बैठकीत कांदा निर्यातबंदीला तीव्र विरोध करत, निर्यातबंदी मागे घेण्याची आग्रही मागणी रविकांत तुपकरांनी केली, सोबतच कांदा उत्पादकांच्या तीव्र भावना देखील तुपकरांनी मांडल्या, निर्णय न घेतल्यास हजारो कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरतील हे देखील सरकारच्या लक्षात आणून दिले.
- ऊस उत्पादकांना वाचविण्यासाठी इथेनॉलबंदी उठविण्याची मागणीही तुपकरांनी लावून धरली.
- ज्याप्रमाणे गारपीट व अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करता, त्याचप्रमाणे ढगाळ वातावरण व हवामानातील बदलामुळे तूर,हरभरा व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून 100% नुकसान भरपाई देण्याची मागणी रविकांत तुपकरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
- दूध उत्पादकांना स्पेशल पॅकेज व दुध भूकटीला निर्यात अनुदान देण्याची मागणी देखील तुपकरांनी केली, यावर अधिवेशनात निर्णय घेण्याचा शब्द ना. देवेंद्र फडणवीसांनी तुपकरांना दिला.
या सर्व निर्णयांसाठी रविकांत तुपकरांनी सरकारला 8 दिवसांचा अल्टिमेटम दिला असून, सरकारने निर्णय घेतल्यास 15 डिसेंबरनंतर सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या आंदोलनाचा राज्यात स्फोट होणार असल्याचा निर्वाणीचा इशारा, रविकांत तुपकरांनी सरकारला दिला आहे.