मुंबई
तलाठी भरती प्रक्रिया पारदर्शकपणे सुरू आहे, या प्रक्रियेत बाह्य हस्तक्षेपाला संधी नाही, तरी आरोप करून सरकारची बदनामी केली जात असेल तर गुन्हा दाखल करू, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिल्यानंतर उमेदवारांचा पारा चढला. ‘चोर तो चोर, वर शिरजोर’ अशा शब्दात उमेदवारांनी आपला संताप व्यक्त केला.
तलाठी भरतीची गुणवत्ता यादी जाहीर होताच रोज नवीन गोंधळ समोर येत आहे. गुणवत्ता यादीमध्ये जळगाव जिल्ह्यातील दोन सख्ख्या भावांना जवळपास सारखे गुण मिळाले आहे. राज्यातून आठ लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली असून गुण ठरवण्यासाठी सामान्यीकरणाचे सूत्र वापरल्याने अधिकचे गुण दिसत असल्याचं स्पष्टीकरण महसूल विभागाकडून देण्यात आलं आहे. २०० मार्कांच्या या परीक्षेत अनेकांना २०० हून अधिक गुण मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
या प्रकरणावर राज्याच्या स्पर्धा परीक्षा समन्वय समितीनेही आवाज उचलला आहे. “चोर तो चोर, वर शिरजोर” अशी एक म्हण आहे. आमच्यावर एक गुन्हे दाखल कराल पण इथ लाखो विद्यार्थी मागणी करत आहेत, महसूल मंत्री सगळ्या विद्यार्थांवर गुन्हे दाखल करून तुरुंगात डांबणार काय? असा सवाल त्यांनी ट्विट करून उपस्थित केला आहे.
तलाठी पदाच्या भरती प्रक्रियेच्या चौकशीसाठी आम्ही तयार आहोत, मात्र भरती प्रक्रिया रद्द होणार नाही, असं विखे यांनी सांगितले.