जालना
मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे.
गेल्या तीन दिवसांपासून त्यांनी पाण्याचा थेंबही घेतलेला नाही. कालपासून पाटलांची प्रकृती खालवल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारपासून जरांगे स्टेजवर झोपून आहेत. तपासणी डॉक्टर आले असता पाटलांनी तपासणी करून घेण्यास नकार दिला. सग्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करत सरकारने कायदा पारित करावा, अशी मागणी जरांगे पाटलांकडून करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील लाखभर मराठा बांधवांना घेऊन मुंबईच्या वेशीपर्यंत आले होते. मात्र यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाटलांच्या सर्व मागण्या मान्य करीत सगेसोयरेंबाबत अध्यादेश काढला होता. यामुळे अध्यादेश घेऊन मराठा बांधव माघारी गेले. मराठा आरक्षणासाठी १५ तारखेला विशेष अधिवेशन घेण्यात येईल, असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. त्यामुळे १५ तारखेला विशेष अधिवेशन घेतलं नाही तर कळेलच असा इशारा पाटलांनी सरकारला दिला आहे. मुख्यमंत्रांकडून अद्याप अध्यादेशाची अंमलबजावणी होत नसल्याने जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमध्ये चौथ्यांदा उपोषण सुरू केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आंतरवालीमध्ये गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे.