महाराष्ट्र ताज्या बातम्या

विकासापासून पळणारे घोषणाबाज सरकार!

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सरकारवर तीव्र हल्लाबोल

मुंबई – राज्याच्या विकासासाठी ठोस उपाययोजना करण्याऐवजी सरकार केवळ घोषणा आणि जाहिरातींच्या माध्यमातून विकासाचा डांगोरा पिटत आहे. मात्र, प्रत्यक्षात सामान्य जनतेपर्यंत विकास पोहोचत नाही, असा तीव्र आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी सभागृहात केला.

“सरकारचा विकास हा फक्त होर्डिंग्ज, जाहिरातबाजी आणि भाषणांपुरताच सीमित आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. हे सरकार केवळ घोषणाबाज असून विकासापासून दूर पळणारे आहे,” असा घणाघाती आरोप दानवे यांनी केला.

मुंबई, पुणे आणि संभाजीनगर महानगरपालिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर टीडीआर घोटाळे झाले असून, राज्य विकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केला. “धारावीच्या पुनर्वसनाच्या नावाखाली जमिनी अदानीच्या घशात घालण्याचे काम सरकार करत आहे,” असा थेट आरोप त्यांनी विधान परिषदेच्या २६० अन्वये प्रस्तावावर बोलताना केला.

नगरविकास विभागांतर्गत येणाऱ्या म्हाडा आणि सिडकोच्या कारभारावरही दानवे यांनी तीव्र टीका केली. “सिडकोने गरिबांसाठी घरांची योजना आणली असली तरी ती सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर आहे. सिडकोचे प्रकल्प फक्त कंत्राटदारांना फायदा व्हावा यासाठी आखले जात आहेत,” असा आरोप त्यांनी केला.

त्याशिवाय, खारघर येथील स्वप्नपूर्ती निवासी संकुलातील मेंटेनन्स थांबवण्याच्या सिडको अधिकाऱ्यांच्या निर्णयावरही दानवे यांनी संताप व्यक्त केला. “सिडकोचे अधिकारी उपमुख्यमंत्र्यांचेही ऐकत नाहीत. त्यांची मुजोरी वाढली आहे,” असा आरोप करत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले.

राज्यात निधी वाटपात पक्षीय भेदभाव केला जात असल्याचा आरोप करत दानवे म्हणाले, “मंत्री नितेश राणे यांनी आमच्या पक्षात आलात तरच निधी मिळेल, असे खुलेआम सांगितले. हा निधी जनतेसाठी आहे की पक्षांतरासाठी?” असा सवाल त्यांनी सरकारला केला.

अर्धवट प्रकल्प आणि प्रशासनाची उदासीनता
• रखडलेले स्मार्ट सिटी प्रकल्प,
• अपूर्ण घरकुल योजना,
• रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका,
• आयुक्तांचा मनमानी कारभार,
• मुंबई-पुणे मार्गावरील वाहतूक कोंडी,
• पाणंद रस्त्यांचे प्रश्न

यांसारख्या मुद्यांवरून दानवे यांनी सरकारला धारेवर धरले.

घाटकोपरमध्ये झालेल्या भीषण होर्डिंग दुर्घटनेनंतर सरकारने धोरण जाहीर केले, मात्र त्याची अंमलबजावणी आजतागायत झालेली नाही, हे त्यांनी सभागृहात अधोरेखित केले.

“हे सरकार फक्त बोलघेवडे आहे, प्रत्यक्षात जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी काहीच करत नाही,” अशी घणाघाती टीका दानवे यांनी केली.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात