मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), मुंबई महानगराच्या वतीने आयोजित ‘छात्र सत्ता’ स्टुडन्ट लीडर मीट कार्यक्रम शुक्रवारी फोर्ट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये उत्साहात पार पडला. यावेळी २०२६-२७ या कार्यकालासाठी अभाविप मुंबई महानगराच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. तसेच मुंबईतील सुमारे ६० महाविद्यालयांच्या अध्यक्ष व मंत्र्यांची (सचिव) नियुक्ती जाहीर करण्यात आली.
यावेळी संदीप शिंदे यांची मुंबई महानगर अध्यक्ष, तर कु. अभिषेक पवार यांची मुंबई महानगर मंत्री म्हणून घोषणा करण्यात आली. याशिवाय सुमारे ५० कार्यकर्त्यांना महानगर कार्यकारिणीत विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या.
कार्यक्रमाला अभाविपचे राष्ट्रीय संघटन मंत्री आशीष चौहान, राष्ट्रीय मंत्री कु. पायल किनाके तसेच पंजाब विद्यापीठ विद्यार्थी संघाचे अध्यक्ष गौरव सिंह सोहेल यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना आशीष चौहान म्हणाले की, “गुणवत्तापूर्ण शिक्षणावर कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही. विद्यार्थी हितासाठी अभाविपने सातत्याने संघर्ष केला असून, एनटीएसमोरील आंदोलन असो किंवा परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठीचा लढा, सर्वप्रथम रस्त्यावर उतरलेली संघटना अभाविपच होती.” व्यक्तिनिर्माणातूनच राष्ट्रनिर्माण घडते आणि विकसित भारतासाठी सक्षम युवाशक्ती उभी करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
पायल किनाके यांनी विद्यार्थ्यांना अभाविपची विचारधारा, कार्यपद्धती आणि विद्यार्थी चळवळीची विधायक भूमिका समजून घेत सामाजिक जाण, राष्ट्रीय विचार आणि नेतृत्वक्षमतेसह कार्य करण्याचे आवाहन केले.
तर गौरव सिंह सोहेल यांनी “ज्ञान, शील, एकता हा केवळ घोष नसून विकसित भारताच्या निर्मितीचा मंत्र आहे,” असे सांगत विद्यार्थ्यांनी वैयक्तिक प्रगतीसोबत राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेतही सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन केले.
मुंबईतील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात आगामी कार्यकाळात विद्यार्थी हिताचे प्रश्न, संघटन विस्तार आणि विविध विद्यार्थी-केंद्रित उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.


Dee Muzzey
July 24, 2026I’ve been absent for a while, but now I remember why I used to love this blog. Thank you, I will try and check back more often. How frequently you update your web site?