मुंबई : “लाडकी बहिण योजना गरीब महिलांसाठी असून ती सुरूच राहील. राज्याचे कर्ज प्रमाण मर्यादेत आहे, आणि महाराष्ट्र थेट विदेशी गुंतवणुकीत देशात पहिल्या क्रमांकावर आहे,” असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्पीय चर्चेला उत्तर देताना दिले.
राज्यातील आर्थिक स्थिती स्थिर – कर्ज सुरक्षित मर्यादेत
अजित पवार यांनी सांगितले की, 2025-26 मध्ये राज्याचे स्थूल उत्पन्न ₹49.39 लाख कोटी असेल, तर कर्ज ₹9.32 लाख कोटी (18.87%) आहे. राज्य 25% कर्ज घेऊ शकते, त्यामुळे सध्याचे कर्ज सुरक्षित मर्यादेत आहे. त्यांनी विरोधकांना टोला लगावत सांगितले की, “कर्जाबाबत चुकीचा समज पसरवणे योग्य नाही. राज्याच्या पतमानांकनावर त्याचा परिणाम होतो.”
पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीला प्राधान्य
अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले की, “महाराष्ट्राने पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक केली असून त्याचा परिणाम स्थूल राज्य उत्पन्नाच्या वाढीवर दिसून येतो. केंद्र सरकारच्या भांडवली खर्चासाठीच्या विशेष सहाय्य योजनेअंतर्गत मार्च अखेरपर्यंत राज्याला ₹12,000 कोटी बिनव्याजी कर्ज मिळणार आहे, ज्याचा उपयोग रस्ते, पर्यटन स्थळांचा विकास, वैद्यकीय महाविद्यालये, नागरी सुविधा आदी प्रकल्पांसाठी केला जाईल.”
विदर्भ आणि मराठवाड्यातील अनुशेष दूर करण्याचा दावा
अर्थमंत्र्यांनी सांगितले की, “राज्यातील भौतिक अनुशेष 96% दूर झाला असून, विदर्भाचा अनुशेष 93%, मराठवाड्याचा 99%, तर उर्वरित महाराष्ट्राचा 100% दूर करण्यात आला आहे.”
शक्तीपीठ महामार्ग आणि बंदरविकास प्रकल्पांना गती
पवार यांनी शक्तीपीठ महामार्ग होणारच, असे ठाम सांगत विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. पर्यावरण समतोल राखून वाढवण बंदर पूर्ण करण्याची ग्वाही दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आणि सांस्कृतिक प्रकल्प
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर 60 फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असून लवकरच त्याचे लोकार्पण होईल, असे पवार यांनी जाहीर केले. तसेच, दिल्लीतील मराठी भाषिकांसाठी सांस्कृतिक भवन उभारले जाईल आणि सांगलीतील बहे (ता. वाळवा) येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भव्य स्मारक उभारले जाईल.
विरोधकांना कोपरखळ्या – “नुसत्या सुपिक डोक्यातील योजना नकोत”
विरोधी पक्षांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना पवार म्हणाले, “विकासासाठी केवळ कल्पना पुरेशा नसतात, त्या प्रत्यक्षात उतरवाव्या लागतात.” विरोधकांनी टाटा समूहावर अनावश्यक टीका करू नये, असे सांगून, “मागील दोन वर्षांत प्रगतीचा वेग प्रचंड होता, म्हणूनच तुम्ही इतक्या कमी संख्येने सभागृहात आलात,” असा टोला त्यांनी लगावला.
”भारत 2047 मध्ये विकसित राष्ट्र होईल”
अर्थचक्राला गती देण्याचा संकल्प व्यक्त करताना पवार म्हणाले, “2047 मध्ये भारत विकसित राष्ट्र होईल, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष्य साकार करण्यासाठी महाराष्ट्र मागे राहणार नाही.”
संत तुकाराम आणि एकनाथ यांचे स्मरण
आपल्या भाषणात संत तुकाराम महाराजांच्या ओळी उद्धृत करत, “ज्याची खरी सेवा नाही भय त्याच्या जीवा,” असा संदेशही त्यांनी दिला.