मंत्री जयकुमार रावल यांची विधानपरिषदेत माहिती
मुंबई : राज्य सरकारने मागील वर्षात देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक ११.२१ लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी केली आहे. मात्र, अजूनही मोठ्या प्रमाणात सोयाबीन शिल्लक असल्याने केंद्र सरकारकडे खरेदीसाठी मुदतवाढ मागितल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानपरिषदेत दिली.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम ९३ अंतर्गत उपस्थित केलेल्या सूचनेला उत्तर देताना मंत्री रावल यांनी राज्यातील सोयाबीन खरेदीची सद्यस्थिती स्पष्ट केली.
राज्यात ५६२ खरेदी केंद्रे आणि ७१० गोदामे
मंत्री रावल म्हणाले की, राज्यात ५६२ खरेदी केंद्रांवर केंद्र सरकारच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी करण्यात आली. तसेच ७१० गोदामांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, आता ही गोदामे पूर्ण क्षमतेने भरली आहेत.
खरेदीला अडथळे आणि बाजारातील संतुलनाचा विचार
सोयाबीन थेट वापरले जाणारे उत्पादन नसल्याने त्याच्या साठवणुकीसाठी प्रक्रिया केंद्रांची संख्या अपुरी पडत आहे. त्याचबरोबर तूर, कापूस यांसारख्या उत्पादनांची खरेदीही सुरू असल्याने अडचणी वाढल्या आहेत.
हमीभावापेक्षा कमी दराने बाजारात विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध शासन कारवाई करू शकते. मात्र, त्यामुळे खरेदी बंद झाल्यास दर आणखी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारातील संतुलन राखणे आवश्यक असल्याचे मंत्री रावल यांनी सांगितले.
राज्य सरकार केंद्राकडे मुदतवाढीची मागणी करणार
महाराष्ट्रात विक्रमी सोयाबीन उत्पादन झाल्यामुळे खरेदीसाठी अजूनही उपाययोजना आवश्यक आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकारकडे मुदतवाढीची मागणी करण्यात येईल, असे मंत्री रावल यांनी स्पष्ट केले.