कल्याण: कल्याण शहरासाठी कालचा दिवस अभिमानाचा आणि सुवर्णाक्षरांनी नोंदवण्याजोगा ठरला. देशातील पहिल्या महिला डॉक्टर डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याने कल्याणकरांच्या दीर्घकाळच्या मागणीला अखेर मूर्त रूप मिळाले. हा केवळ भूमिपूजन सोहळा नव्हता, तर महिलांच्या शिक्षण, संघर्ष आणि यशाच्या इतिहासाला दिलेला सार्वजनिक मान होता.
कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संरक्षिका गीताताई गुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हजारो नागरिकांच्या साक्षीने हा सोहळा उत्साहात पार पडला. या स्मारकासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने प्रकल्पाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेला शब्द पाळत शिंदे यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती दिली आहे.
या स्मारकासाठी भाजप नेते आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सुरुवातीपासून सातत्याने पाठपुरावा केला होता. कल्याणमध्ये डॉ. आनंदीबाई जोशी यांचे भव्य स्मारक उभारावे, ही हजारो नागरिकांची भावना त्यांनी शासनापर्यंत पोहोचवली होती. त्यानंतर राज्य सरकारच्या पातळीवर आवश्यक पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून घेण्यात त्यांना यश आले.

या स्मारकाची संकल्पना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संरक्षिका गीताताई गुंडे आणि वनवासी कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय संघटन मंत्री सदाशिव देवधर यांच्या पुढाकारातून साकारण्यात येत आहे. हे स्मारक केवळ ऐतिहासिक स्मरणचिन्ह न राहता महिलांसाठी प्रेरणास्थळ ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून देशातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी यांची प्रेरणादायी गाथा या स्मारकातून जिवंत ठेवली जाणार आहे. त्यांच्या कार्यातून महिलांच्या सक्षमीकरणाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केला.
या स्मारकात डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या जीवनकार्यावर आधारित माहिती, म्युरल्स आणि दृश्यरूप मांडणी करण्यात येणार असून, महिलांसाठी एक सक्षम केंद्र म्हणून ते विकसित करण्यात येणार आहे. आधुनिक जिम, कौशल्यविकास प्रशिक्षण केंद्र, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सुसज्ज ऑडिटोरियम यांसारख्या सुविधा येथे उभारण्यात येणार आहेत. याशिवाय महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
भूमिपूजन सोहळ्यानिमित्त वसंत व्हॅली परिसर आकर्षक सजावटीने नटला होता. चौकाचौकात रांगोळ्या, रोषणाई, माहिती फलक आणि भव्य कटआउट्स यांमुळे संपूर्ण परिसर ‘आनंदीबाई जोशीमय’ झाला होता. कार्यक्रमस्थळी त्यांच्या जीवनपटाचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. याच वेळी माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या कार्यअहवालाचेही प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमास कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर ॲड. हर्षाली थविल चौधरी, उपमहापौर राहुल दामले, आमदार सुलभा गायकवाड, आमदार महेश चौगुले, भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब, गटनेते शशिकांत कांबळे, तसेच विविध पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

