मुंबई : एकेकाळी महाराष्ट्रातील आक्रमक विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेतील दमदार नेते, तर आजचे भाजप खासदार नारायण राणे हे पत्रकार परिषदेत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. “काळ बदलला, राजकारण बदलले, मी आज आहे, उद्या असेन नसेन, पण समाजासाठी काहीतरी देऊन जावे, कारण समाज आणि इतिहास हे पाहत असतात,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
आज प्रदेश भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नेहमीच्या आक्रमक आणि परखड शैलीतील राणेंच्या संवेदनशील आणि भावूक रूपाचे दर्शन घडले. “मी पंचावन्न पदे निर्माण केली, अकरा पदांवर काम केले आणि प्रत्येक पदाला न्याय दिला,” असे सांगत त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री असताना दाऊदशी बोलणाऱ्या ३७ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली.
महाराष्ट्र आणि राजकारण याबाबत बोलताना पत्रकारितेतही बदल झाल्याचे त्यांनी सांगितले. “हा पेशा पवित्र आहे, त्याचे पावित्र्य राखले पाहिजे. बातमी देताना शब्दांत फेरफार नसावा. प्रत्येकालाही एक संसार आणि कुटुंब असते, हे विसरू नका,” असा सल्लाही त्यांनी दिला.
प्रश्नोत्तर सत्रात दिशा सालियन प्रकरणावर भाष्य करताना ते अधिक भावूक झाले. “दिशाच्या जागी कोणाचीही बहिण किंवा मुलगी असू शकली असती. दोषींवर एफआयआर दाखल करा, अटक करा. तिच्या कुटुंबाला न्याय मिळायलाच हवा. पोलिसांनी सत्य लपवू नये, कारण परमेश्वर आहे हे लक्षात ठेवा,” असा ठाम आग्रह त्यांनी धरला.
भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर दाखवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगले काम करत आहेत, असे सांगतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी राजकारण समजून घ्यावे आणि फार बोलू नये, असा टोला त्यांनी लगावला.