फडणवीस, शिंदे व अजित पवार यांच्याकडे मोदींची पत असेल, तर महाराष्ट्रासाठी विशेष आर्थिक पॅकेज आणा
अकोला : “भाजपाला जर खरंच मुस्लीम समाजाची काळजी असेल, तर त्यांनी एखाद्या मुस्लीम नेत्याला पंतप्रधान किंवा पक्षाध्यक्ष पद दिलं पाहिजे,” अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
अकोल्यात काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना सपकाळ म्हणाले की, “काँग्रेसने ८९ अध्यक्ष दिले, त्यात सर्व जाती-धर्म, महिला, आदिवासी, एससी-एसटी यांचा समावेश होता. पण भाजप फक्त मुस्लीम समाजाची सहानुभूती मिळवण्याचे काम करत आहे. तीन तलाक आणि वक्फ बोर्ड कायद्याचा दाखला देत भाजपाने आता एखाद्या मुस्लीम व्यक्तीला पक्षाच्या सर्वोच्च पदावर बसवावे.”
ते पुढे म्हणाले, “मोदी ७५ वर्षे पूर्ण करत आहेत, जे. पी. नड्डा यांचीही मुदत संपली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनाही विश्रांती द्यावी व त्यांच्या जागी आदिवासी किंवा दलित व्यक्तीची निवड व्हावी.”
राज्याच्या आर्थिक अवस्थेवर हल्लाबोल
पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले की, “राज्यात सर्व सत्ता फक्त तीन नेत्यांच्या हातात असून, त्यांनी लुटारूंची व्यवस्था निर्माण केली आहे. शेतकऱ्यांना हमीभाव नाही, नुकसान भरपाई नाही. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार प्रलंबित आहेत. जर फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांची मोदींकडे पत असेल, तर त्यांनी महाराष्ट्रासाठी विशेष आर्थिक पॅकेज आणावे आणि कर्जमाफीसह आर्थिक घडी रुळावर आणावी.”
कायदा सुव्यवस्था धोक्यात
“राज्यात ड्रग्स, गांजा, अंमली पदार्थांची अवैध तस्करी सुरू असून, पोलिस कारवाई करत नाहीत. पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा-सुव्यवस्थेची अवस्था बिकट झाली आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
या वेळी कुणाल चौधरी, आमदार साजिद पठाण, डॉ. प्रशांत वानखेडे, अशोक अमानकर, अजहर हुसेन आदी मान्यवर उपस्थित होते.