महाराष्ट्र ताज्या बातम्या

मेट्रो मार्ग ७अ मधील भुयारी बोगद्याचे ‘ब्रेक थ्रू’ यशस्वीरित्या पूर्ण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (MMRDA) प्रस्तावित मेट्रो मार्ग ७अ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी२) ते अंधेरी पूर्व दरम्यानच्या १.६५ किमी लांबीच्या भुयारी बोगद्याचा ‘ब्रेक थ्रू’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज यशस्वीरित्या पूर्ण झाला.

या वेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार पराग अळवणी, MMRDA चे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल व अन्य अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरुवातीला प्रकल्पाची माहिती घेऊन बोगद्याच्या ‘ब्रेक थ्रू’ प्रक्रियेचा शुभारंभ कळ दाबून केला आणि नंतर प्रत्यक्ष स्थळी पाहणी केली. हा बोगदा मेट्रो ७अ च्या डाउनलाइनवर असून, टी२ विमानतळ स्टेशन ते एअरपोर्ट कॉलनी स्टेशन दरम्यान असणार आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर क्षेत्रातील मेट्रो जाळ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. मेट्रो मार्ग ७अ मुळे मीरा-भाईंदर, वसई-विरार क्षेत्र थेट छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडले जाणार आहेत. तसेच ठाणे व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशीही मेट्रोद्वारे जोडणी शक्य होईल. सद्यःस्थितीत या मार्गाचे ५९% काम पूर्ण झाले आहे.

मेट्रो मार्ग ७अ विषयी

या मार्गाची एकूण लांबी ३.४ किमी असून, त्यापैकी ०.९४ किमी उन्नत आणि २.५ किमी भूमिगत मार्ग आहे. या मार्गावर दोन स्थानके असणार आहेत — एक एअरपोर्ट कॉलनी (उन्नत मार्गावर) आणि दुसरे टी२ (भूमिगत).

उन्नत मेट्रो मार्गाची लांबी ०.५७ किमी असून, दुहेरी बोगद्याची लांबी २.०३५ किमी आहे. १ सप्टेंबर २०२३ रोजी डाउनलाइन बोगद्याच्या ड्राइव्हला सुरुवात झाली होती. या १.६५ किमी लांब बोगद्याच्या लाईनिंगसाठी ११८० प्रिकास्ट रिंग्ज बसविण्यात आल्या आहेत. बोगद्याचा व्यास ६.३५ मीटर असून, सहा भागांमध्ये विशेष डिझाईन असलेल्या रिंग्ज वापरण्यात आल्या आहेत.

टीबीएम (टनेल बोरिंग मशीन) सप्टेंबर २०२३ मध्ये जमिनीपासून ३० मीटर खाली दाखल करण्यात आली होती. या बोगद्याने मेट्रो मार्ग ३ वरून, सहार उन्नत रस्ता, सांडपाणी वाहिन्या आणि जलवाहिन्यांखालून जात अनेक तांत्रिक अडचणींवर मात करत ‘ब्रेक थ्रू’ पूर्ण केला आहे.

या प्रकल्पामुळे कुलाबा ते वसई-विरार व मीरा-भाईंदरपर्यंतचा प्रवास अधिक आरामदायी, सुरक्षित आणि जलद होणार आहे. मेट्रो मार्ग ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) आणि मेट्रो मार्ग ७अ यांची विमानतळ स्थानकाजवळ सुलभ जोडणी होणार असून, विविध मेट्रो मार्ग थेट विमानतळाशी जोडले जातील.

या मार्गात उन्नत व भुयारी मार्गांचा वापर केल्यामुळे, विमानतळ परिसरातील जागेचा कमीत कमी वापर करून प्रकल्प पूर्ण केला जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात