मुंबई : महाराष्ट्र विविध क्षेत्रांत आघाडीवर असून, युरोपियन युनियनसोबत गुंतवणूक व व्यापाराच्या संधी असलेल्या क्षेत्रांची निश्चिती करणे गरजेचे आहे. यासाठी राजशिष्टाचार व पणन विभाग युरोपियन युनियनला आवश्यक ते सहकार्य करेल, असे प्रतिपादन राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज केले.
सह्याद्री अतिथीगृह येथे युरोपियन युनियन चेंबर्स (भारतीय हितधारक) यांच्या प्रतिनिधींशी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, युरोपियन युनियन चेंबर्सचे उपाध्यक्ष रॉबिन बॅनर्जी, संचालक डॉ. रेणू शोमे तसेच संबंधित पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.
मंत्री रावल पुढे म्हणाले, महाराष्ट्रात कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध आहेत. युरोपियन युनियनसोबत परस्पर सहकार्याच्या माध्यमातून व्यापार वाढवण्यासाठी महत्त्वाची क्षेत्रे निश्चित झाल्यानंतर, त्या-त्या क्षेत्रातील अधिक सखोल चर्चा करता येईल. यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल.
महाराष्ट्राची कृषी उत्पादनातील विविधता व गुणवत्ता युरोपियन बाजारपेठेसाठी अत्यंत आकर्षक आहे, असे सांगत त्यांनी सांगितले की, हापूस आंबा, डाळिंब, द्राक्षे, कांदा, हळद, तांदूळ आणि गहू यांसारख्या उच्च प्रतीच्या कृषी उत्पादनांचे उत्पादन महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर होते. ही उत्पादनं युरोपियन युनियनमधील विविध ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास सक्षम आहेत. विशेषतः कोकणातील हापूस आंबा आणि पुण्याची द्राक्षे ही उत्पादने युरोपियन बाजारात विशेष मागणी असलेली आहेत, असेही मंत्री रावल यांनी नमूद केले.