नवी दिल्ली: मुंबईची वाढती लोकसंख्या, कॅन्सर रुग्णांचे वाढते प्रमाण, यामुळे रुग्णालयांवरचा वाढता ताण, रुग्णांना वेळेवर उपचार न मिळणे यावर प्रभावी उपाययोजना करण्याबरोबरच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा देण्यासाठी मुंबई उपनगरात एआयआयएमसच्या (एम्स) धर्तीवर रुग्णालय व कॅन्सरवर संशोधन केंद्र उभारण्यास प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभेत लोकहिताय महत्वाच्या विषयांवर बोलताना मुद्दा मांडला.
खासदार वायकर म्हणाले की, मुंबई ही केवळ महाराष्ट्राची आर्थिक राजधानी नसून संपूर्ण देशातिल जनता विविध आजारांवरील उपचारासाठी मुंबई येतात. मुंबईच्या लोकसंख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णसेवेवरही त्याचा ताण पडत आहे. त्यातच रुग्णालयही आधुनिक साधनांनी युक्त करणे आवश्यक आहे. मुंबईत के. ई. एम व टाटा सारखी रुग्णालये आहेत पण ती देखील अपुरी पडत आहेत. देशात कॅन्सर रुग्णांचे प्रमाण वाढत असून स्थिती अधिक गंभीर बनत आहे. फक्त कॅन्सर रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे रुग्णांना वेळवर उपचार मिळत नाही. खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार ही महाग होत चालले आहे.
बिहार राज्यात दोन एम्स रुग्णालयाची स्थापना करण्यात आली आहे, याकडे लक्ष वेधताना वायकर म्हणाले की, महाराष्ट्रात नागपूर येथे फक्त एकच एम्सचे रुग्णालय आहे. मुंबईत मात्र एकही एम्स सारखे रुग्णालय नसणे ही निश्चितच चिंतेचा विषय आहे. एम्सची मुंबईत स्थापना केल्यास मध्यवर्गीय, गरीब रुग्णांना माफक दरात उपचार मिळणे शक्य होईल. यासाठी केंद्र सरकारने तत्काल पावले उचलल्यास सर्वसामान्य रुग्णांना आधार मिळेल. त्यामुळे मुंबई उपनगरात एम्सच्या धर्तीवर रुग्णालय सुरू करावे, तसेच कॅन्सरवर संशोधन रुग्णांसाठीही रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी खासदार रविंद्र वायकर यांनी लोकहिताय महत्वाच्या विषयावर बोलताना केली.