ईव्हीएम, बीड व परभणी प्रकरणावर महाविकास आघाडी आक्रमक; ‘वन नेशन, नो इलेक्शन’ विधेयक लोकशाही संपवण्यासाठी.
नागपूर: ईव्हीएमच्या माध्यमातून निवडून आलेले भाजपा युती सरकार लोकशाही व्यवस्थेचा खून करत आहे. परभणीत पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली दलित बांधवांवर अत्याचार केले आणि यामध्ये सोमनाथ सुर्यवंशी या दलित युवकाचा पोलिसी मारहाणीत मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेच, बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या करण्यात आली. सरकारच्या या घटनांवरील उदासीन भूमिकेवर टीका करताना महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप सरकारला लोकांच्या भावनांशी काहीही देणेघेणे नसल्याचा आरोप केला.
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनासमोर ईव्हीएम, बीड आणि परभणी प्रकरणावर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “सरपंच संतोष देशमुख यांच्या खुन्यांना अटक करा,” अशी मागणी करण्यात आली, तसेच “खुन्यांना संरक्षण देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो” अशा घोषणाही देण्यात आल्या.
सभागृहाचे कामकाज सुरु होताच नाना पटोले यांनी परभणीत पोलिस अत्याचार व सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. पोलिसांनी केलेले कोंबिंग ऑपरेशन शासनाच्या आदेशानुसार होते का, याचा तपास व्हावा आणि यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्ताव दिल्याचे त्यांनी सांगितले. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी चर्चा घेण्याचे आश्वासन दिले.
पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत वापरलेली ईव्हीएम यावेळी विधानसभेसाठी वापरण्यात आली नाहीत. गुजरातहून विशेष ईव्हीएम मागवण्यात आल्या असून, त्यांचा दुरुपयोग झाला आहे. भाजपाचे लोक ईव्हीएम बनवणाऱ्या कंपन्यांच्या संचालक मंडळात असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोगावर दबाव टाकून भाजप आपल्या सोयीने कारभार करत आहे.
“वन नेशन, नो इलेक्शन” हे विधेयक आणून आरएसएसची लोकशाही संपवण्याची मानसिकता पुढे आणली जात आहे, असा गंभीर आरोप करत नाना पटोले यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.