मुंबई
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाइव्हदरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा या व्यक्तीने घोसाळकरांवर गोळ्या घातल्या. त्याने आपल्या सुरक्षा रक्षकाची पिस्तूल घेऊन गोळ्या झाडल्याचं सांगितलं जात आहे. या पिस्तुलाच्या परवान्याविषयीही शंका उपस्थित केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. याशिवाय गेल्या वर्षी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गणेशोत्सवादरम्यान ठाकरे गट आणि शिंदे गटात झालेल्या राड्यात गोळीबार केल्याचं सांगितलं जात होतं.
मॉरिसने राजकीय वैमनस्यातून अभिषेक घोसाळकरांची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. यासाठी त्याने प्लानिंग केली होती. महाराष्ट्रात वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे.
या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक झाल्याची माहिती आहे. काल वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीत परवानाधारक शस्त्रांचा दुरुपयोग होत असल्यावर चर्चा झाली. ज्यांच्याकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना आहे, त्यांना बोलावण्यात येईल आणि चौकशी होईल, असा निर्णय या बैठकीत झाल्याची माहिती आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारांशी बोलताना याचा उल्लेख केला. परवानाधारक पिस्तूलांवरही नियंत्रण आणण्याची गरज असल्याचं मत त्यांची व्यक्त केलं.