मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; सज्जतेसाठी राज्यभरात युद्धपातळीवर उपाययोजना

मुंबई : भारत आणि पाकिस्तानदरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील एकूणच सुरक्षेचा आणि प्रशासनाच्या सज्जतेचा उच्चस्तरीय आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही यावेळी उपस्थित होते.

या बैठकीत मॉकड्रिल, ब्लॅकआऊट, सायबर हल्ल्यांचा धोका, जनजागृती, आणि शत्रूराष्ट्राच्या मदतीसाठी वापरली जाणारी सामाजिक माध्यमे यांसह विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागांना युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

बैठकीस प्रभारी मुख्य सचिव राजेशकुमार, राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, नागरी सुरक्षाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रभातकुमार, गृहविभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक शिरीष जैन तसेच मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले महत्त्वाचे निर्देश पुढीलप्रमाणे:
• प्रत्येक जिल्ह्यात मॉकड्रिल करा आणि जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापन करा.
• ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलशी समन्वय ठेवून पर्यायी विद्युत यंत्रणा आणि गडद रंगाचे पडदे/काचा वापरून सुरक्षितता राखा.
• ब्लॅकआऊट म्हणजे काय, यावेळी नागरिकांनी काय करावे, यासंदर्भातील माहितीपट विद्यार्थ्यांना आणि जनतेला दाखवा; व्यापक जनजागृती करा.
• केंद्र सरकारच्या ‘युनियन वॉर बुक’चा सखोल अभ्यास करा आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांना याची माहिती द्या.
• प्रत्येक जिल्ह्यात सायबर सेलने सोशल मीडियावर नजर ठेवून पाकिस्तानला मदत करणारी हँडल्स ओळखा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करा.
• जिल्हाधिकाऱ्यांना आजच आपत्कालीन निधी वितरित करा; यापेक्षा अधिक मदतीची आवश्यकता असल्यास प्रस्ताव 1 तासात मंजूर करा.
• एमएमआरमधील सर्व महापालिकांची बैठक घेऊन ब्लॅकआऊटविषयी जागरूकता वाढवा; सहकारी गृहनिर्माण संस्थांचाही सहभाग घ्या.
• पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन्स वाढवावीत आणि गस्त अधिक तीव्र करावी.
• सैन्यसंबंधी हालचालींचे चित्रिकरण व प्रसारण हे गंभीर गुन्हे असून त्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा.
• सागरी सुरक्षेसाठी आवश्यकतेनुसार फिशिंग ट्रॉलर्स भाड्याने घ्या.
• नागरिकांना अचूक आणि वेळोवेळी माहिती देण्यासाठी राज्य शासनाने माहिती व्यवस्थापन केंद्र सुरू करावे.
• महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर सायबर हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन त्वरित सायबर ऑडिट करून घ्या.
• अधिक समन्वयासाठी लष्कराच्या तिन्ही दलांचे व कोस्टगार्डच्या प्रमुखांना पुढील बैठकीत VCद्वारे सहभागी करा.
• राज्यातील आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आदी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या तात्काळ रद्द करा.

राज्य शासनाने युद्धपातळीवर सज्जता ठेवण्याचे धोरण स्वीकारले असून नागरिकांनी अफवांपासून सावध राहून अधिकृत माहितीच ग्रहण करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात