भाजपच्या गाव – वस्ती संपर्क अभियानांतर्गत राबवण्यात आलेला उपक्रम
कल्याण : भारतीय जनता पक्षाच्या जुने कल्याण मंडलामार्फत कल्याण पश्चिमेतील पारनाका परिसरात आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात 26 आणि 27 एप्रिल रोजी गाव – वस्ती संपर्क अभियान राबविण्यात आले. या राज्यस्तरीय अभियानांतर्गत भाजपच्या जुने कल्याण मंडळाचे अध्यक्ष अमित धाक्रस यांच्या पुढाकाराने पारनाका परिसरात हा उपक्रम राबविण्यात आला.
भारतीय जनता पक्ष आणि या पक्षाची विचारधारा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय नेतृत्वाकडून महाराष्ट्रभरात या गाव – वस्ती संपर्क अभियानाची आखणी करण्यात आली आहे. त्यानुसार, गाव किंवा शहरी भागातील मंदिर परिसर, रुग्णालय किंवा शाळा परिसरामध्ये स्वच्छता उपक्रम राबविण्याचे निर्देश राष्ट्रीय नेतृत्वाकडून देण्यात आले आहेत.
पक्षनेतृत्वाने दिलेल्या या निर्देशानुसार, जुने कल्याण मंडळातर्फे पारनाका येथील श्रीराम मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. आज, कल्याण पश्चिमेतील पारनाका येथील राम मंदिर परिसरात स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये अनेक नागरिक आणि परिसरातील महत्त्वाच्या व्यक्तींनी सहभाग घेतला. या सर्वांनी मिळून श्रीराम मंदिर परिसर आणि आजूबाजूचा भाग स्वच्छ केला.
स्वच्छता अभियान पूर्ण झाल्यानंतर सर्व सहभागी नागरिकांनी त्या परिसरातील महत्त्वाच्या व्यक्तींची भेट घेत स्वच्छतेच्या कार्याबद्दल मार्गदर्शन मिळवले. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होण्यासह परिसर अधिक स्वच्छ आणि सुंदर झाला, अशी प्रतिक्रिया भाजप जुने कल्याण मंडळाचे अध्यक्ष अमित धाक्रस यांनी दिली.
या स्वच्छता अभियानामध्ये हेमलता नरेंद्र पवार, एस एम जोशी, हेमंत पाठक, संदीप जोशी, विनायक भावे, मंदार संत, महेश केळकर, राजेश देसाई, रामजी देवस्थान ट्रस्टचे प्रकाश लेले, गजानन महाराज मठाचे विश्वस्त गणेश खैरनार यांच्यासह संदीप पळणीटकर आणि प्रसाद चाफेकर हेदेखील उपस्थित होते.