महाड : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरील शिवसमाधीच्या अष्टकोनी चौथर्यावर चढण्यास कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी जोरदार मागणी गड किल्ले संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रसाद चंद्रकांत दांगट पाटील यांनी भारतीय पुरातत्व विभागाकडे केली आहे.
रायगडावर दररोज लाखो शिवभक्त आणि पर्यटक भेट देतात. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि विविध पक्षांचे नेतेसुद्धा या ऐतिहासिक स्थळाला भेट देतात. मात्र, काही वेळा अनावधानाने किंवा अतिउत्साहाने हे मान्यवर थेट समाधीच्या अष्टकोनी चौथर्यावर चढून अभिवादन करतात, जे अत्यंत निंदनीय आणि समाधीच्या पावनतेचा अवमान करणारे आहे. अशा घटनांची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावरही वारंवार दिसून आले आहेत.
शिवसमाधी हे केंद्र सरकारचे संरक्षित स्मारक असून त्यास विशेष धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे चौथर्यावर चढण्यास कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी लेखी मागणी प्रसाद दांगट पाटील यांनी भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालकांना केली आहे.
त्यांनी यासोबतच पुढील उपाययोजनांचीही मागणी केली आहे: चौथऱ्याभोवती संरक्षित रेलिंग लावणे, चौथऱ्यावर फक्त साफसफाईसाठी नियमबद्ध परवानगी देणे, साफसफाईदरम्यान छायाचित्रणास सक्त मनाई करणे, नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाईची तरतूद करणे
या मागण्यांमुळे रायगडावरील शिवसमाधीचे पावित्र्य जपले जाईल आणि भविष्यात कोणताही अवमान होण्याची शक्यता दूर होईल, असेही त्यांनी नमूद केले आहे.