मुंबई/परळी – महाराष्ट्राला थोर सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा लाभली असली तरी गेल्या काही वर्षांत काही शक्तींनी जाणीवपूर्वक राज्यात जातीय तेढ निर्माण करून सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. बीड जिल्ह्यातील काही घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्याची प्रतिमा मलीन झाली आहे. हे चित्र बदलावे आणि महाराष्ट्र धर्म टिकवावा, या उद्देशाने काँग्रेस पक्षाने परळीत सद्भावना सत्याग्रह आयोजित केला, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
परळी येथील गांधी स्मृती स्तंभाजवळ झालेल्या या सत्याग्रहात हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सत्याग्रहाआधी सपकाळ यांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि महाराष्ट्र सहप्रभारी कुणाल चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, मोहन जोशी, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, बीड जिल्हाध्यक्ष राहुल सोनावणे, युवा नेते आदित्य पाटील, सरचिटणीस अमर खानापूरे, परळी शहराध्यक्ष बहादूरभाई, ॲड. प्रकाश मुंडे, शिवाजीराव देशमुख यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
या वेळी बोलताना सपकाळ म्हणाले, “शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांची ही भूमी आहे. पण आज त्या विचारांवर आघात होतो आहे. सद्भावनेचा अभाव जाणवतो आहे. संतोष देशमुखांसारख्या सरपंचाची निर्घृण हत्या होते आहे. जातीच्या आधारावर खरेदी-विक्रीचा आग्रह धरला जातो, जे अत्यंत दुर्दैवी आहे.”
काँग्रेसने सामाजिक सलोखा वाढावा म्हणून सद्भावना यात्रा सुरू केली असून, पहिली यात्रा मस्साजोग ते बीड दरम्यान झाली. यात्रेला सुरुवात करताना भगवान बाबा आणि नगद नारायण यांना साकडे घालण्यात आले. आज परळीतही वैद्यनाथाच्या नगरीत सद्भावनेचा जागर करण्यात आला. “महादेवाने दिलेला अद्वैताचा संदेश म्हणजेच सद्भावनेचा मंत्र – तो प्रत्येक नागरिकाने अंगीकारावा,” असे आवाहन सपकाळ यांनी केले.
“भाजपा युती सरकारच्या १०० दिवसांचा रिपोर्ट कार्ड त्यांनी स्वतः प्रसिद्ध केला. पण याच १०० दिवसांत महाराष्ट्राला काय मिळाले? ‘आका’ आणि ‘खोके’ – हे शब्द! आणि हे दोन्ही शब्द बीड जिल्ह्यातूनच राज्यात आले. महिला अत्याचार, शेतकऱ्यांची दुर्दशा, थांबलेली कर्जमाफी आणि बहिणींना न दिलेले आर्थिक सहाय्य – हे सारे वास्तव भाजप सरकारच्या अपयशाचे दर्शन घडवते,” असा आरोप सपकाळ यांनी केला.
सद्भावना यात्रेच्या पुढील टप्प्यात ४ मे रोजी परभणीत सद्भावना यात्रा आणि ५ मे रोजी संविधान बचाव यात्रा आयोजित करण्यात आली आहे, असे सपकाळ यांनी सांगितले.