By: योगेश त्रिवेदी
रुचिरा दिघे, हेमंत पाटकर आणि सचिन वगळ यांचा पुरस्काराने सन्मान
मुंबई : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक व सामाजिक कार्यकर्ते विजय वैद्य यांनी ४२ वर्षापूर्वी सुरू केलेली जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला आजही अखंड सुरू असून, ती हीच महाराष्ट्राच्या सामाजिक भानाची जिवंत परंपरा आहे. “आम्ही एकदम खासदार-आमदार झालेलो नाही, या व्याख्यानमालांमधूनच आम्ही घडलो. २५-५० तरुण गोळा करून सतरंज्यांवर बसत व्याख्यानं ऐकत समाजात कसे वागायचे हे शिकलो,” असे भावनिक उद्गार भाजप नेते व माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी यावेळी काढले.
जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना त्यांनी विजय वैद्य यांच्या कार्याचा गौरव करत, “ही व्याख्यानमाला अविरत सुरू राहावी यासाठी मी, विनोद घोसाळकर, ॲड. संदेश कोंडविलकर आणि आमचे सर्व सहकारी कायम तुमच्या पाठीशी राहू,” असे आश्वासन दिले.
कार्यक्रमात गोपाळ शेट्टी आणि काँग्रेसचे मुंबई विभागीय उपाध्यक्ष ॲड. संदेश कोंडविलकर यांच्या हस्ते तीन व्यक्तींना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शारदा पुरस्कार – ज्येष्ठ नागरिक संघ, बोरीवली (पूर्व) यांच्या अध्यक्षा रुचिरा दिघे यांना, जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार – मागाठाणे मित्र मंडळाचे कार्यकर्ते हेमंत पाटकर यांना तर जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार (कार्यकर्ता विशेष) – गेली ४३ वर्षे व्याख्यानमालेची जबाबदारी समर्थपणे सांभाळणारे सचिन वगळ यांना देण्यात आला.
ॲड. संदेश कोंडविलकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना, “विजय वैद्य आणि अनिल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ‘संवाद व्याख्यानमाला’ सुरू केली,” असे नमूद केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सौ. नयना रेगे यांनी खुमासदार शैलीत केले. कार्यक्रमाला श्रीमती वैशाली वैद्य, शिवचरित्र अभ्यासक राजू देसाई, बँक संघटनेचे नेते राजन नेरुरकर, भारतीय कामगार सेनेचे माजी पदाधिकारी देवराम भोसले, शाखाप्रमुख अभिलाष कोंडविलकर, जनता केंद्राचे विश्वस्त दिनेश राणे, एअर इंडियाच्या निवृत्त अधिकारी मीना नाईक, उद्योजक विजय घरटकर, वसंत सावंत, चित्रकार मनोज सनान्से, रोहिणी चौगुले, कांचन सार्दळ आदींसह अनेक मान्यवर नागरिक व ज्येष्ठ नागरिक संघांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता ख्यातनाम गायिका संगीता मिरकर यांच्या सुमधुर आवाजातील पसायदान आणि राष्ट्रगीताने झाली.