मुंबई : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे एमआयडीसी स्थापन करण्याचा निर्णय झाला असून, जमीन हस्तांतरणाचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली. तसेच, सदस्यांच्या मागणीनुसार आणखी एक बैठक लवकरच आयोजित करण्यात येईल आणि शहादा एमआयडीसी निश्चितच पूर्णत्वास नेली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. राजेश पाडवी यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
ते म्हणाले, नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा असून, तो अद्याप औद्योगिक विकासापासून वंचित आहे. जिल्ह्यात दारिद्र्य, बेरोजगारी, कुपोषण आणि दरडोई उत्पन्न घटणे यांसारख्या समस्या गंभीर आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ६०% आणि शहादा तालुक्यातील ५३% गावांमधून आदिवासी लोकसंख्या स्थलांतरित झाली आहे, याकडे पाडवी यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच, शासनाने यावर कोणत्या उपाययोजना आखल्या आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
यावर उत्तर देताना उद्योगमंत्री सामंत म्हणाले, सामूहिक प्रोत्साहन योजनेत नंदुरबार हा आकांक्षित जिल्हा म्हणून समाविष्ट आहे. येथे येणाऱ्या उद्योगांना विशेष सवलती आणि गुंतवणूक तसेच रोजगारासंदर्भात शिथिल निकष लागू करण्यात आले आहेत. नंदुरबारमध्ये सध्या १,५८६ उद्योग कार्यरत आहेत. स्थलांतर रोखण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. मौजे टोकरतळे येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) कार्यालय स्थापन केले जाईल. आदिवासी प्रकल्पांतर्गत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविली जात आहे. कुपोषण कमी करण्यासाठी राज्य पोषण अभियानांतर्गत विविध उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.
शहादा एमआयडीसी शंभर टक्के प्रत्यक्षात उतरणार असल्याचे मंत्री सामंत यांनी ठामपणे सांगितले.