मुंबई – समाजातील आर्थिक दुर्बल व आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या महामानव प्रतिष्ठान आणि एक वही, एक पेन अभियानाने यंदाची भीमजयंती शैक्षणिक उपक्रमांद्वारे साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
महापुरुषांच्या जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन, सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती तसेच मान्यवर व्यक्तींच्या वाढदिवसानिमित्त लाखो रुपयांचा खर्च केला जातो. यातील काही अनावश्यक खर्च टाळून समाजातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे, विद्यार्थी दत्तक घेणे, विनामूल्य एमपीएससी व युपीएससी क्लासेस चालवणे, तसेच शाळा आणि वस्त्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक प्रवासावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणे शक्य आहे, असे आवाहन महामानव प्रतिष्ठानच्या “एक वही, एक पेन” अभियानांतर्गत करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आणि रमाई यांच्या जयंतीदिनी तसेच गणेशोत्सवात त्यांना वह्या, पेन, पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य देऊन अभिवादन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभर आणि परदेशात महिनाभर साजरी केली जाते. या निमित्ताने वह्या, पेन, पुस्तके, दप्तरे, सुस्थितीतील मोबाइल, लॅपटॉप यांसारख्या शैक्षणिक वस्तू अभिवादन म्हणून अर्पण कराव्यात आणि त्या साहित्याची योग्य वाटणी संबंधित पुतळा समित्या किंवा मंडळांनी गरजू विद्यार्थ्यांना करावी, असे एक वही, एक पेन अभियानाचे प्रणेते राजू झनके यांनी आवाहन केले आहे.
या अभियानांतर्गत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानभवनात भेट घेण्यात आली. समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी मागील १० वर्षांपासून सुरू असलेल्या “एक वही, एक पेन” अभियानाचे त्यांनी कौतुक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणप्रेम लक्षात घेता, राज्यात ठिकठिकाणी हे अभियान व्यापक स्वरूपात राबवावे, असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी शिवसेना उपनेत्या कला शिंदे, उपनेते राहुल लोंढे, ज्येष्ठ पत्रकार व अभियान प्रमुख राजू झनके, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार व समाजभूषण नासिकेत पानसरे, ज्येष्ठ पत्रकार जासंग बोपेगावकर, महेश पावसकर आणि पत्रकार प्रफुल चव्हाण उपस्थित होते.