महाराष्ट्र ताज्या बातम्या

देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकीर्द पणाला! 

X : @vivekbhavsar

यंदाची लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेससाठी जितकी महत्त्वाची आहे तितकीच महाराष्ट्रामध्ये दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपसाठी देखील तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. या पक्षांच्या अस्तित्वाचीच ही लढाई आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. देशात नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असा लढा सुरू आहे तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस विरुद्ध उद्धव ठाकरे अशीच ही लढत आहे. कधीकाळ सत्तेत एकत्र असलेले आणि एकमेकांचा सन्मान करणारे हे दोन्ही नेते आज केवळ राजकीय विरोधक नाही तर कट्टर वैरी झाले आहेत. शिवसेना पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे यांना “टायगर अभी जिंदा है” हे दाखवून द्यायचे आहे तर देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील राजकारणातील “बाप” मीच आहे हे सिद्ध करायचे आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस यांची राजकीय प्रतिष्ठा आणि राजकीय कारकीर्द पणाला लागली आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. 

देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते. प्रशासनावर उत्तम पकड, निर्णय घेण्याची क्षमता, सगळ्या विषयांची जाण आणि वैयक्तिक पातळीवर भ्रष्टाचारापासून कोसो दूर ही त्यांची खासियत राहिली. त्यांच्या याच कारकिर्दीने प्रभावित होऊन सर्वपक्षीय आमदार, कार्यकर्ते आणि सामान्य माणूस त्यांना जोडला गेला. त्यात माझाही अपवाद नव्हता हे सांगताना मला कमीपणा वाटत नाही. (पण मी भाजपचा समर्थक आहे असा अर्थ कोणीही काढू नये). पण राजकारणात टिकून राहण्यासाठी जे- जे हातखंडे अवलंबावे लागतात, ते ते अवलंबताना देवेंद्र फडणवीस यांनी अनेक नेत्यांना दुखावले, अनेकांना घरचा रस्ता दाखवला. 

यशाचं शिखर गाठताना तुम्हाला कोणाच्यातरी डोक्यावर पाय ठेवून, त्याला दाबून, चेपून आणि संपवूनच वर जावे लागते, हा राजकारणातला अत्यंत वाईट पण अपरिहार्य मार्ग आहे. याच मार्गाचा अवलंब करताना फडणवीसांनी एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे अशा अनेक नेत्यांना प्रत्यक्ष – अप्रत्यक्षरीत्या दुखावले, त्यांची राजकीय कारकीर्द अडचणीत आणली. अर्थात ज्या नेत्यांचा उल्लेख केला आहे, ते फार धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होते, अशातला भाग नाही, अनेकांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला आणि स्वतःच त्या जाळ्यात फसत गेले. 

याचा अर्थ फडणवीस देखील फार स्वच्छ होते, अशातला भाग नाही, मात्र त्यांनी तीन W पासून कायमच स्वतःला लांब ठेवले. फडणवीस यांच्या कॅरेक्टरवर त्यांचा विरोधक देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही, याची मला खात्री आहे. उद्धव ठाकरे हे दुसरे नेते ज्यांच्या कॅरेक्टरवर देखील कधीही कोणी शंका उपस्थित करणार नाही. बाकी अन्य नेत्यांबाबत इथे बोलायला नको, अर्थात तो त्यांचा खाजगी मामला आहे.

एक किस्सा सांगतो, नाव सांगणार नाही. फडणवीस मुख्यमंत्री होते, पक्ष निधीसाठी जे काय करावे लागते ते त्यांनी केले असेल, पण वैयक्तिक स्वार्थासाठी कधी एक रुपयाला त्यांनी हात लावला नाही, हे मी छातीठोकपणे सांगू शकतो. एक बिल्डर होता, त्याला त्याचे नियमात न बसणारे काम करून घ्यायचे होते. तो फडणवीसांची वेळ मागत होता आणि फडणवीस त्याला वेळ देत नव्हते. एक दिवशी “वर्षा”वर अभ्यासतांच्या यादीत त्याचं नाव आले आणि तो थेट फडणीसांच्या केबिनमध्ये शिरला. त्याला प्रवेश कसा मिळाला आणि कोणी दिला याचे आश्चर्य आणि संताप या दोन्ही प्रतिक्रिया फडणवीसांकडून त्यावेळी व्यक्त झाल्या असतील. कारण त्यांनी “वर्षा”वरील कर्मचाऱ्यांची चांगली शाळा घेतली होती. त्याला प्रवेश कसा मिळाला या प्रश्नावर त्या बिल्डरचे उत्तर होते की, “साहब मैने तो आलाना फलाना (नाव सांगणे योग्य नाही) व्यक्ती को ” पहूच दिया है, आप कम से कम मेरी बात तो सून लो”, मात्र फडणवीस यांनी त्याला सरळ बाहेरचा रस्ता दाखवला होता. हा आला ना फलाना कोणी ऐरा गैरा नव्हता एवढेच सांगतो. यातून त्यांचा स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त कामकाजाची झलक दिसते.

सर्वाधिक आमदार निवडून आणून देखील सत्ता स्थापन करता आली नाही, याची सल फडणवीसांच्या मनात असावी आणि म्हणूनच त्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे अनेक प्रयोग केले आणि अखेर त्यात ते यशस्वी झाले. शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसही त्यांनी फोडली. पण यातून जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल असलेली आस्था, प्रेम याची जागा राग आणि तिरस्काराने घेतली. खरे तर पाच वर्षे विरोधी पक्षात बसून महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्टाचार उघडकीस आणून त्यांना बदनाम करता आले असते आणि यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला शंभर टक्के एक हाती सत्ता मिळवणे सहज शक्य होते. मात्र सत्ता प्राप्तीसाठी त्यांनी जे काही महाराष्ट्रात केले, त्यात महाराष्ट्राची बदनामी झालीच, शिवाय राजकारण ढवळून निघालं, विश्वास, अविश्वास आणि विश्वासघात यांचे नव्याने संदर्भ जोडले जाऊ लागले आणि विश्वासघाताचे दुसरे नाव देवेंद्र फडणवीस अशी एक प्रतिमा राज्यभर निर्माण झाली. 

फडणवीस यांच्या दुर्दैवाने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि फडणवीस यांची इच्छा नसताना त्यांना उपमुख्यमंत्री हे दुय्यम आणि असंविधानिक पद स्वीकारणे भाग पडले. यात ४० आमदार आणि १५ खासदार फोडून आणणारे शिंदे यांचे कर्तुत्व तसे मोठेच होते, त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा भाजपच्या वरिष्ठांचा निर्णय कदाचित योग्य असेल, परंतु ज्युनियरच्या हाताखाली सीनियर आणि अत्यंत कार्यक्षम, अनुभवी असलेल्या फडणवीस यांना काम करायला लावून भाजपाच्या वरिष्ठांनी फडणवीसांचं राजकीय खच्चीकरण करण्याची सुरुवात केली. 

80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या धोरणावर काम करणारे एकनाथ शिंदे ८० रुपये समाजकारणासाठी तर वीस रुपये त्यांच्या राजकारणासाठी खर्च करतात. सढळ हाताने मदत करणारा नेता ही एकनाथ शिंदे यांची ओळख आहे. याच ऐंशी टक्के समाजकारण अर्थात “विटामिन”च्या पुरवठ्यामुळे त्यांनी केवळ महाराष्ट्रातील त्यांच्या पक्षाचे आमदारच जोडले नाहीत तर भाजपच्या वरिष्ठांच्या नजरेत देखील स्वतःचे एक स्थान निर्माण केले. 

मला असे वाटते की एकनाथ शिंदे एवढा व्हिटॅमिन पुरवठा करू शकतात तर देवेंद्र फडणवीस यांनी का नाही केला? महाराष्ट्र ही दुभती गाय आहे आणि याच दुभत्या गाईच्या दुधाचा सर्वाधिक वाटा फडणवीसांनी स्वतःसाठी तर ठेवला नाही ना? अशी शंका भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनामध्ये आली असावी आणि तिथूनच शिंदे यांचे दिल्लीतील वर्चस्व वाढत गेले आणि फडणवीसांचं वजन कमी होत गेले असावे. 

फडणवीस यांच्या दुर्दैवाने दिल्लीमध्ये विनोद तावडे यांचं राजकीय वर्चस्व वाढलं, त्यांना प्रचंड अधिकार प्राप्त झाले, या निवडणुकीत उमेदवार ठरवण्याचे अधिकार देखील अमित शहा यांच्या सोबतीने विनोद तावडे यांना प्राप्त झाले आणि तावडे यांनी फडणवीस यांच्या बाबतीतील जुना हिशोब चुकता केला. जागा वाटपात आणि उमेदवार निवडीमध्ये विनोद तावडे यांनी फडणवीस यांच्यावर मात केली. 32 जागा लढवण्याठी फडणवीस आग्रही होते, मात्र एकनाथ शिंदे यांच्या अनेक उमेदवारांची निवडून येण्याची पात्रता नसताना देखील त्यांना 15 जागा सोडण्यात तावडे आणि भाजपच्या वरिष्ठांची भूमिका महत्त्वाची ठरली. पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन, एकनाथ खडसे यांना पुन्हा भाजपमध्ये घेण्यासाठीचा अट्टाहास, या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने बघितलं तर फडणवीसांचं राजकीय खच्चीकरण करण्याचा विडा दिल्लीश्वरांनी उचलला आहे  की काय अशी शंका यावी.

महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात काम करत आहेत. भाजपने कधीही प्रादेशिक पक्षांना वाढू दिले नाही हा इतिहास आहे. त्यामुळे ज्यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली, ते आपल्या शिवसेनेला देखील संपवतील, अशी भीती एकनाथ शिंदे यांच्या शिरेदारांच्या मनात आहे आणि म्हणूनच भाजपचे संख्याबळ कसे कमी होईल, यासाठी शिंदेसेना अनेक ठिकाणी काम करते आहे. 

पाडापाडीच्या राजकारणात केवळ शिवसेनाच नाही तर भाजपचे देखील नुकसान होणार आहे. हजारो ईव्हीएम मशीन एकच वेळी हॅक होऊ शकतात, यावर माझा विश्वास नाही. परंतु ज्या पद्धतीने मतदानानंतर दहा – दहा दिवसांनी वाढीव मतदानाची आकडेवारी जाहीर केली जात आहे, त्यावरून शंका घेण्याला वाव आहे. भाजपाने असे कुठलेही हातखंडे वापरले नाहीत तर यावेळी भाजपसाठी अत्यंत लाजिरवाणा निकाल असेल. महाराष्ट्रात भाजपला गेल्या वेळी निवडून आलेल्या जागा देखील राखता आल्या नाहीत तर या पराभवाचे खापर देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडले जाईल. भाजपमधील फडणवीस विरोधकांना तेच हवे आहे. मात्र फडणवीसांचा हिशोब चुकता करण्यासाठी त्यांचे विरोधक जो खेळ खेळत आहे, त्यातून महाराष्ट्राचे आणि देशाचेही प्रचंड नुकसान होणार आहे. 

कोणाचे कितीही राजकीय मतभेद असू द्या, एका बाबतीत सगळ्यांचे मत ठाम असेल आणि ते म्हणजे या राज्याला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री आणखी पाच वर्ष लाभणे आवश्यक होते, तसे झाले असते तर महाराष्ट्राची आणखी प्रगती झाली असती. अर्थात आता वेळ निघून गेली आहे. पक्ष फोडाफोडीच्या राजकारणामुळे देवेंद्र फडणवीस खूप बदनाम झाले आहेत. राज्याचा पुढचा मुख्यमंत्री ब्राह्मण नसेल हे तर भाजप नेते ठामपणे सांगत आहेत. अर्थात विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असेल की महायुतीचं याबद्दल आत्ताच सांगता येणे कठीण आहे. 

देशात आणि राज्यात हवा बदलली आहे. राज्यात भाजपाला पुरेशा जागा मिळाल्या नाहीत तर विधानसभेमध्ये सत्तांतर निश्चित होईल. पण समजा भाजपचे सरकार येणार असेल, तरीही देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार नाही, हे भाजप मधीलच त्यांचे विरोधक ठामपणे सांगत आहे. महायुतीचे सरकार स्थापन करताना भाजपने एकनाथ शिंदे या मराठा नेत्याकडे राज्याची धुरा सोपवली. राष्ट्रवादी फोडून त्यांना सत्तेत घेताना अजित पवार या दुसऱ्या मराठा नेत्याला उपमुख्यमंत्री केलं. त्यामुळे आता पुढचा मुख्यमंत्री हा ओबीसी समाजातून असेल हे निश्चित. या राज्याची एक परंपरा राहिली आहे की, जो व्यक्ती या राज्यात उपमुख्यमंत्री होतो, तो आयुष्यात पुन्हा कधीच मुख्यमंत्री होत नाही. हा नियम अजित पवारांसह देवेंद्र फडणवीस यांना देखील लागू होऊ शकेल. 

विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस यांना राज्यसभेवर निवडून आणून केंद्रात पाठवले जाईल आणि कुठले तरी दुय्यम मंत्रीपद देऊन त्यांचे आणखीनच राजकीय खच्चीकरण केले जाईल अशी खुली चर्चा भाजपमध्येच केली जात आहे. जी व्यक्ती भविष्यात पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ शकते, तिला तुम्ही संपवण्याची भाषा करतात, याचे भान देखील भाजपच्या महाराष्ट्रातील फडणवीस विरोधकांना नाही आणि केंद्रातील गुजराती नेत्यांना तर नाहीच नाही. 

(लेखक विवेक भावसार हे “राजकारण” (therajkaran.com) या पोर्टलचे संपादक आहेत. त्यांच्याशी 9930403073 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.)

Avatar

Vivek Bhavsar

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात