महाराष्ट्र ताज्या बातम्या

औरंगजेबाच्या थडग्यावरून राज्य पेटवू नका – जितेंद्र आव्हाड यांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई – “मोगल बादशहा औरंगजेबाचे थडगे ही महाराष्ट्राच्या शौर्याची निशाणी आहे. लाखो सैन्यासह आलेल्या औरंगजेबाला आग्र्याला परत जाता आले नाही. त्याची कबर उकरून शिवरायांना छोटे करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा महाराष्ट्र जळेल!” असा जोरदार इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत दिला.

विधानसभेच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेच्या प्रारंभी पाऊण तासाच्या भाषणात त्यांनी कायदा व सुव्यवस्थेची ढासळलेली परिस्थिती, महिलांवरील अत्याचार, ऑनर किलिंग, पोलीस दलाचे राजकीयकरण, सायबर गुन्हेगारी, ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामे आणि येऊर जंगलातील बेकायदेशीर बंगल्यांचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

ते पुढे म्हणाले, “परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीत झाला, हे पोस्टमार्टम अहवाल स्पष्ट दाखवतो. अल्पसंख्याक दलित समाजातील या तरुणाच्या हत्येतील सत्य समोर आणा आणि त्याच्या आईला न्याय द्या.”

त्यांनी अक्षय शिंदे हत्या प्रकरणावरही सरकारला धारेवर धरले आणि संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. तसेच, अक्षय शिंदे यांच्या आईवर केस मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप केला.

बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उल्लेख करत आव्हाड म्हणाले, “हत्येचे फोटो बाहेर आल्यानंतरच मंत्र्यांनी राजीनामा दिला. पुणे, नाशिकसह संपूर्ण राज्यात हप्तेखोरी सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यात वेगळे ‘आका’ निर्माण झाले आहेत.”

त्यांनी राज्यातील जनसुरक्षा कायदा हा विद्रोही चळवळी दडपण्यासाठी वापरण्यात येत असल्याचा आरोप केला आणि अनेक निष्पाप लोकांचे बळी जातील, असा इशारा दिला.

तसेच, राज्यात आधीपासूनच ४४३ नर्सिंग कॉलेज असताना नव्याने ४०५ कॉलेज मंजूर करण्यामागे ४०५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार असल्याचा सनसनाटी आरोप त्यांनी केला.

जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका करत “पाशवी बहुमत मिळवले म्हणून लोकशाहीची हत्या करू नका,” असा इशारा दिला. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे विधानसभा गोंधळात सापडली आणि सरकारकडून कोणते उत्तर येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात