मुंबई – “क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची शिफारस करण्याचा महाराष्ट्र विधानसभेचा एकमताने मंजूर केलेला ठराव ऐतिहासिक आहे. हा निर्णय प्रगत, पुरोगामी आणि सुधारणावादी महाराष्ट्राच्या लौकिकात भर घालणारा तसेच ‘भारतरत्न’ पुरस्काराचा गौरव वाढवणारा आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला.
अजित पवार यांनी “संपूर्ण देशवासियांच्या लोकभावनेचा आदर करणारा हा ठराव सर्वानुमते मंजूर होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व विधीमंडळ सदस्यांचे” आभार मानले.
महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणाची दारे खुली केली. आज स्त्रिया शेती, शिक्षण, विज्ञान, संशोधन, अंतराळ, राजकारण, समाजकारण अशा सर्व क्षेत्रांत जबाबदारीची पदे भूषवत आहेत. या परिवर्तनाचे श्रेय महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या दूरदृष्टीला आणि अथक परिश्रमांना जाते.
अजित पवार म्हणाले, “समाजातील दुर्बल, वंचित आणि बहुजन समाजापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांनी केलेले कार्य अलौकिक आहे. त्यामुळेच संपूर्ण देशासाठी ते कायम ‘महात्मा’ राहतील.”
महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेला हा ठराव लोकभावनेचा आदर करणारा आणि ‘भारतरत्न’ पुरस्काराचा गौरव वाढवणारा ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.