खासदार रविंद्र वायकर यांच्या संकल्पनेतून दिल्लीमध्ये ३० एप्रिल व १ मे रोजी आंबा महोत्सवाचे आयोजन
नवी दिल्ली : दिल्लीकरांना लवकरच अस्सल देवगड व रत्नागिरी हापूस आंब्याची चव चाखण्याची संधी मिळणार आहे. २७ मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार रविंद्र वायकर यांच्या संकल्पनेतून दिल्लीतील महाराष्ट्र सदनात ३० एप्रिल व १ मे (महाराष्ट्र दिन) रोजी आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्त्वतः मान्यता दिली असून, ही संकल्पना त्यांना आवडल्याने ते स्वतः या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहण्याची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात खासदार रविंद्र वायकर यांनी आज (सोमवारी) पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना आग्रहाचे निमंत्रण दिले. यावेळी पंतप्रधान मोदींनी प्रत्येक राज्यातील जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या फळांना अधिक बाजारपेठ मिळावी यासाठी राज्यांनी प्राधान्य द्यावे, असे मत व्यक्त केले.
कोकणातील देवगड व रत्नागिरीचा हापूस आंबा संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. मात्र, कोकणातील शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांना अधिक नफा मिळावा आणि आंब्याच्या निर्यातीला चालना मिळावी, या हेतूने खासदार रविंद्र वायकर यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे.
या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार असून, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विविध राज्यांतील खासदार व आमदार यांनाही निमंत्रण देण्यात येणार आहे.
या भेटीदरम्यान खासदार रविंद्र वायकर यांनी मुंबईतील वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन गारगाई-पिंजाळ प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. यावर पंतप्रधानांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पांची व्याप्ती वाढवण्यावर भर देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
तसेच, एम्सच्या धर्तीवर मुंबईत एक अत्याधुनिक रुग्णालय सुरू करावे आणि त्यामध्ये कॅन्सर रुग्णांसाठी विशेष उपचार सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी विनंतीही खासदार वायकर यांनी पंतप्रधानांकडे केली. यावर पंतप्रधानांनी सकारात्मकता दर्शवली.
याशिवाय, पीएमसी बँकेतील ठेवीदारांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठीही खासदार वायकर यांनी पंतप्रधानांशी चर्चा करून निवेदन सादर केले.