मुख्यमंत्र्यांच्या विश्वासू सहकाऱ्यावर मोठी जबाबदारी
मुंबई – गोरगरिबांचे देवदूत म्हणून ओळखले जाणारे डॉ. ओमप्रकाश शेटे यांची आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली असून सरकारच्या वतीने त्यासंबंधी शासकीय परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा सन्मान म्हणून त्यांची ही पदोन्नती झाली असून, या निर्णयामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
डॉ. ओमप्रकाश शेटे हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून परिचित आहेत. २०१४-२०१९ च्या कार्यकाळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्या काळात फडणवीस सरकारच्या ‘सातवा माळा’ने गोरगरिबांसाठी आरोग्य मंदिराचे स्वरूप घेतले होते आणि डॉ. शेटे यांनी त्या मंदिराचे पुजारी म्हणून आपले कर्तव्य पार पाडले.
या माध्यमातून लाखो रुग्णांना मदत मिळाली. मुख्यमंत्री सहायता निधीतून ६०० कोटी आणि धर्मादाय कोट्यातून १२०० कोटी रुपयांचे मोफत उपचार उपलब्ध करून देण्याचा विक्रम त्या काळात झाला होता. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात गरीब रुग्णांसाठी मिळणाऱ्या मदतीत मोठी घट झाली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना एकत्र करून लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य सेवा मिळवून देण्याची महत्त्वाची जबाबदारी डॉ. शेटे यांच्यावर सोपवली आहे.
या निर्णयामुळे राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी डॉ. शेटे यांचा दांडगा अनुभव उपयोगी ठरेल.
डॉ. ओमप्रकाश शेटे – एक सक्षम पर्याय
विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांनी आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनांमधील त्रुटींवर तीव्र टीका केली होती. पाच लाख रुपयांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाही, असे आरोप करण्यात आले होते.
ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्यासारख्या अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती केली असल्याचे मानले जाते.
रुग्ण आणि रुग्णालये दोन्ही वाचली पाहिजेत
राज्यातील १८०० हून अधिक रुग्णालये प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत कार्यरत आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रुग्णालयांवर देखरेख आणि नियंत्रण आवश्यक आहे.
योजनेचा रुग्ण आणि रुग्णालये दोघांनाही समतोल फायदा मिळावा यासाठी डॉ. ओमप्रकाश शेटे योग्य समन्वय साधतील, यात शंका नाही. त्यांच्या यापूर्वीच्या प्रशासकीय आणि आरोग्य क्षेत्रातील अनुभवाचा योजनेच्या सुधारण्यासाठी निश्चितच फायदा होईल.