मुंबई – पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील सहा नागरिकांच्या कुटुंबीयांना येत्या १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ‘नागरी शौर्य’ पुरस्काराने गौरविण्यात यावे, तसेच कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
एका पत्रकार परिषदेत बोलताना खा. सुळे म्हणाल्या की, “पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप नागरिकांची दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केली. या हल्ल्यात डोंबिवलीतील संजय लेले, हेमंत जोशी, अतुल मोने, पनवेलचे दिलीप देसले, पुण्याचे कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे हे सहा जण मृत्युमुखी पडले.”
“या घटनेने देशभर शोककळा पसरली असून, सर्व नागरिक एकजूट दाखवत भारत सरकारसोबत खंबीरपणे उभे आहेत,” असेही त्यांनी सांगितले.
खा. सुळे यांनी सांगितले की, “या कुटुंबीयांनी या अत्यंत कठीण प्रसंगात जे धैर्य दाखविले, ते उल्लेखनीय आहे. म्हणूनच या कुटुंबीयांना ‘नागरी शौर्य’ पुरस्काराने सन्मानित करावे. तसेच, मृत संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे कायद्याचे शिक्षण पूर्ण करत असून, तिला तिच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय सेवेत संधी द्यावी. त्याच धर्तीवर इतर कुटुंबीयांतील पात्र सदस्यांनाही नोकरीची संधी देण्यात यावी.”
केंद्र सरकारने योग्य ती पावले उचलतील, असा विश्वास व्यक्त करताना सुळे यांनी म्हटले, “राज्य सरकारने माणुसकीच्या नात्याने या कुटुंबीयांसाठी जे काही शक्य आहे, ते करावे.”
भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सुळे म्हणाल्या, “भाजपाचेच खासदार जर केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित करत असतील, तर त्यांना योग्य ठिकाणी प्रश्न विचारण्याची गरज आहे. मात्र, सध्या टीकेचा काळ नाही. आम्ही सर्वपक्षीय बैठकीत दिलेल्या शब्दानुसार काही दिवस केंद्र सरकारवर टीका करणार नाही.”
तसेच, पहलगाम घटनेशी संबंधित संवेदनशील फोटो प्रसारित न केल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्रातील मीडियाचे आभार मानले.
पुरंदर विमानतळ प्रकल्पावर बोलताना खा. सुळे म्हणाल्या, “विमानतळाचे काम प्रेमाने व सन्मानाने व्हावे, जबरदस्ती नको.”
ड्रग्स विरोधातील लढ्यावर त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले. “ड्रग्समुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही सरकारसोबत ताकदीने उभे राहू,” असेही त्यांनी स्पष्ट केले.