मुंबई – शेतकरी आत्महत्यांचा सरकारने घेतलेला बळी म्हणून विचार करायला हवा. नांदेडच्या हरिदास बोंबले यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या फडणवीस सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत केली.
राज्यातील दुष्काळ, रोजगाराचा अभाव, जलजीवन योजनेतील भ्रष्टाचार आणि शेतमालाला भाव नाही यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे, असा आरोप त्यांनी केला. “हे सरकार आंधळं, बहिरं आणि मुकं झालंय. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अमित शाह यांच्यासोबत फिरण्यापेक्षा दिल्लीत जाऊन विशेष मदतीचं पॅकेज आणावं,” अशी टीका सपकाळ यांनी केली.
छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर असलेल्या ‘बंच ऑफ थॉट’ या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी का करत नाहीत, असा सवालही त्यांनी भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांना केला. “महाराजांचा अपमान करा आणि संरक्षण मिळवा” अशी योजना भाजपा सरकार चालवत आहे,” अशी घणाघाती टीका सपकाळ यांनी केली.
एमपीएससीच्या नियोजनशून्य कारभारावरही त्यांनी नाराजी व्यक्त करत “पोर्टल बंद, सूचना धूसर आणि नियोजनात गोंधळ; परीक्षा ४५ दिवसांच्या नोटीसनंतर घ्या,” अशी मागणी केली.
ईव्हीएमबाबत अमेरिकेसह अनेक देशांनी शंका व्यक्त केल्या असताना निवडणूक आयोग गप्प का, असा सवाल उपस्थित करत “लोकशाही टिकवायची असेल तर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक हवी. VVPAT मतमोजणी सक्तीची करा,” असे सपकाळ म्हणाले.