किल्ले रायगड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५व्या पुण्यतिथीनिमित्त श्री शिवाजी रायगड स्मारक स्थानिक उत्सव समितीच्या वतीने किल्ले रायगडावर अभिवादन समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी हजारो शिवभक्तांनी महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली.
समारंभात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपस्थित शिवभक्तांना संबोधित करताना, “छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या पराक्रमाची कीर्ती जगभर पोहोचवणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन केले. “ज्या भूमीवर महाराजांनी सुवर्ण सिंहासन स्थापित केले, त्या पवित्र भूमीवर उभं राहताना शब्द अपुरे वाटतात,” असे सांगत शाह यांनी शिवरायांनी संपूर्ण देशभर हिंदवी स्वराज्याची संकल्पना पोहोचवल्याचे गौरवोद्गार काढले.
या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री चंद्रकांत पाटील, उदयनराजे भोसले, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, खासदार धैर्यशील माने, तसेच विधान परिषदेतील भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्थानिक उत्सव समितीचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे यांनी प्रारंभिक भाषणात समितीच्या कार्याचा आढावा सादर केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सरकार हे शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे असल्याचे सांगितले. “शिवरायांनी अठरापगड जातींना एकत्र करून भगवा झेंडा अटकेपार नेला. आज त्यांच्या अवमानाला टकमक टोक दाखवण्याची गरज आहे,” असे त्यांनी ठणकावले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवरायांच्या तलवारीत मानवतेचा सुगंध असल्याचे नमूद करत, “महाराष्ट्रात वाढणारी विषवल्ली ठेचून काढावी लागेल,” असा निर्धार व्यक्त केला.
उदयनराजे भोसले यांनी देखील आपल्या भाषणात ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी काही मागण्या मांडल्या.
या प्रसंगी दुर्ग अभ्यासक नीलकंठ रामदास पाटील यांना ‘श्री शिवस्मृती रायगड स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. याशिवाय होळकर घराण्याचे वारसदार उदयसिंह होळकर आणि भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ‘शिवराय मुद्रा’ स्मरणिका आणि ‘धर्मयोगिनी अहिल्या होळकर’ या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी झाले.
सुरक्षेचा अतिरेक – भाविकांची गैरसोय
कार्यक्रमास अनेक उच्चपदस्थ नेते आणि मंत्री उपस्थित असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव गडावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामुळे स्थानिक नागरिक व शिवभक्तांना विविध मर्यादा पाळाव्या लागल्या. चप्पल, गॉगल, पेनसारख्या वस्तूंनाही बंदी होती. राजसदर परिसरात मोजक्याच शिवभक्तांना प्रवेश मिळाला होता. सकाळी ८ वाजता उपस्थित झालेल्या अनेक भाविकांना कार्यक्रम संपेपर्यंत बाहेर पडण्याची मुभा मिळाली नव्हती, त्यामुळे त्रास सहन करावा लागला.
दरम्यान, केंद्रीय उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नाने यंदा शिवसमाधीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली.