महाड : भारत आणि पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे राज्यात पेट्रोल, डिझेल आणि रॉकेलसह इतर इंधनाच्या टंचाईचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी जिल्ह्यातील सर्व इंधन पुरवठादार व रेशन दुकानदारांना पुरेसा साठा राखण्याच्या स्पष्ट सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.
सोनवणे यांनी आज ‘पुशा/कात-5/युद्धजन्य परिस्थिती 2025/885’ या क्रमांकाच्या परिपत्रकात म्हटले आहे की, “भारत-पाकिस्तान दरम्यान तणावपूर्ण स्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, रॉकेल तसेच अन्नधान्याच्या साठ्यावर ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक पुरवठादाराने आपल्या गोदामात व दुकानदारांनी त्यांच्या दुकानात आवश्यक त्या प्रमाणात साठा करून ठेवावा.”

पेट्रोल पंपांवर गर्दीची शक्यता
ही सूचना जाहीर झाल्यानंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तसेच जिल्ह्यातील विविध भागांतील पेट्रोल पंपांवर वाहनचालकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी इंधन संपण्याच्या भीतीने गोंधळ, बाचाबाची किंवा तणाव निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता स्थानिक प्रशासनाकडून वर्तवली जात आहे.
सावधगिरी आणि नियोजन गरजेचे
सद्यस्थितीत जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पातळीवर यंत्रणा सतर्क आहे. इंधन व अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यासोबतच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.