महाराष्ट्र ताज्या बातम्या

१८ वर्षे रखडलेला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग: सरकारचं अपयश?

इंदापूर-माणगाव बायपास रखडल्यामुळे प्रवासी त्रस्त; वाहतूक कोंडीने नाकेबंदी

महाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ चं काम तब्बल १८ वर्षांपासून सुरु असूनही अद्याप पूर्णत्वास गेलेलं नाही. विशेषतः इंदापूर आणि माणगाव या दोन ठिकाणी बायपास न झाल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी कोकणातील प्रवाशांसाठी मोठं संकट ठरत आहे. सण-वार, सुट्ट्यांच्या काळात तर परिस्थिती आणखी बिकट होते.

४८० किलोमीटर लांबीच्या या महामार्गाचं सुमारे ७० टक्के काम पूर्ण झालं असलं, तरी उर्वरित अपूर्ण काम प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. वळणदार, अरुंद आणि अपघातप्रवण जुना रस्ता वापरण्याची सक्ती असल्यामुळे वेळ आणि सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. हा महामार्ग केवळ रस्ता नसून, कोकणच्या भविष्यासाठीची जीवनवाहिनी आहे – रोजगार, पर्यटन, शेती, मत्स्य व्यवसाय, आरोग्य आणि शिक्षण या सर्वांशी तो जोडलेला आहे.

इंदापूर आणि माणगाव बायपास रखडला कसा?

पनवेलपासून कोकणात जाताना इंदापूर आणि माणगाव ही दोन प्रमुख अडथळ्याची ठिकाणं ठरली आहेत. शहरातून जाणारा जुना मार्ग, त्यावरची दुकाने, घरे, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी – यावर तोडगा म्हणून बायपास मार्ग आखण्यात आला होता. मात्र दोन्ही ठिकाणी हे काम रखडले.

चेतक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला हे काम देण्यात आलं होतं. रेल्वे प्रशासन आणि वन विभागाच्या कोणत्याही अडचणी नसताना देखील, कंपनीने वेळेत काम सुरु न केल्यामुळे डिसेंबर २०२४ मध्ये तिचा ठेका रद्द करण्यात आला. एप्रिल २०२५ मध्ये नवीन निविदा प्रक्रिया राबवून ‘एलएनए जयपूर’ या कंपनीने २५ टक्के कमी दराने हा ठेका घेतला असून, अद्याप त्यांना कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) दिलेला नाही.

”हत्ती गेला आणि शेपूट राहिली”– कोकणवासीयांचा रोष

महामार्गाचं ९९ टक्के काम पूर्ण झालं असलं, तरी या दोन बायपासमुळे संपूर्ण प्रकल्प अपूर्ण असल्याचा अनुभव प्रवाशांना दररोज येतो. तीन-चार तासांपर्यंत होणारी वाहतूक कोंडी ही प्रवाशांसाठी एक प्रकारची नरकयात्रा बनली आहे. त्यामुळे “हत्ती गेला आणि शेपूट राहिली” अशी उपहासात्मक टीका कोकणवासीय करत आहेत.

लोकप्रतिनिधी कुठे आहेत?

महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात गेल्या १८ वर्षांत आंदोलने झाली, रस्ता रोको झाले, पण कोणताही सत्ताधारी खासदार किंवा आमदार रस्त्यावर उतरलेला दिसला नाही. पाहणी दौरे, घोषणा आणि आश्वासनं या पलीकडे काहीच घडलं नाही. मग प्रश्न राहतो – इंदापूर आणि माणगावचे बायपास अजूनही अपूर्ण का?

राष्ट्रीय महामार्ग विभागाचं स्पष्टीकरण: “बायपाससाठी नवीन ठेकेदार निवडण्यात आला असून लवकरच काम सुरु होईल. मात्र पूर्ण कामासाठी किमान एक वर्ष लागणार आहे,” असं सहाय्यक कार्यकारी अभियंता अक्षरा डहाके यांनी स्पष्ट केलं.

कोकणवासीयांची अपेक्षा:

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वेळोवेळी डेडलाइन जाहीर करतात, मात्र प्रत्यक्षात हे काम केव्हा पूर्ण होईल याबाबत राज्यातील लोकप्रतिनिधींकडे काहीही ठोस उत्तर नाही. कोकणवासीयांच्या सहनशीलतेची आता कसोटी लागली असून, ‘हा महामार्ग खरंच पूर्ण होणार का?’ असा सवाल ते पुन्हा पुन्हा विचारत आहेत.

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात