मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण असताना, या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर थेट आरोप करत “भांडूपचा भोंगा पाकिस्तानची भाषा बोलतोय” अशी कठोर टीका केली आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत निरुपम यांनी राऊतांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत जनतेलाही त्याचा विरोध करण्याचे आवाहन केले.
निरुपम म्हणाले, “पाकिस्तानला पहलगाम हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. केंद्र सरकारकडून पाकिस्तानविरोधी ठोस पावले उचलली जात आहेत. सिंधू जल करार स्थगित करण्यात आला असून चिनाब व झेलम नद्यांवर धरणांचे काम थांबवले आहे. लष्कराकडून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याची तयारी सुरू आहे.”
संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना निरुपम म्हणाले की, “हुकुमशाहीविरोधात लढा देतो म्हणणारे राऊत निवडणुकीनंतर भाजपसोबत पुन्हा हातमिळवणीसाठी उद्धव ठाकरेंमार्फत प्रयत्न करत होते.” त्यांनी दावा केला की, ठाकरे गटाचे अनेक खासदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत होते आणि खुद्द ठाकरे यांनीच त्यांना रोखले होते. मात्र आता भाजपने उद्धव ठाकरे यांच्यासाठी दरवाजे बंद केले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, ‘लाडकी बहिण योजना बंद झाली’ असा संजय राऊत यांनी काल केलेला दावा खोटा असून, ती योजना सुरुच आहे आणि भविष्यात लाभ वाढवण्याचा सरकारचा मानस आहे, असा विश्वास निरुपम यांनी व्यक्त केला.