महाड : पाणी ही केवळ माणसाचीच नव्हे, तर निसर्गातील प्रत्येक जीवाची मूलभूत गरज आहे. मात्र महाड तालुक्यातील पाणीटंचाईमुळे सुमारे ६ हजार पाळीव जनावरे आणि असंख्य वन्य प्राणी पिण्याच्या पाण्यासाठी व्याकूळ झाले आहेत. दिवसेंदिवस भूगर्भातील जलपातळी घटल्यामुळे गावातील नैसर्गिक पाणवठे कोरडे पडत चालले आहेत. परिणामी वन्य प्राणी मानवी वस्त्यांकडे वणवण भटकत येत असून यामुळे संभाव्य मानव-प्राणी संघर्षाचे सावट गडद होत आहे.
महाड तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींतील ८ गावे आणि सुमारे १०० वाडी- वस्त्यांना पाणीटंचाईने ग्रासले आहे. या भागांतील अंदाजे २६ हजार लोकसंख्येबरोबरच ६ हजार पाळीव जनावरेही पाण्यासाठी मैलोनमैल फिरत आहेत. आधी नैसर्गिक पानवठ्यांवर या जनावरांना पाणी मिळत असे, पण आता हे स्रोत आटल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे.

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला महाड तालुका निसर्गसंपन्न असला तरी गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड, डोंगरांतील उत्खनन, दगड खाणींमध्ये जिलेटिनचा वापर यामुळे पर्यावरणीय संतुलन ढासळले आहे. यामुळे जंगलातील झरे, ओढे आणि जलस्रोत नाहीसे झाले आहेत.
गावशेजारील विहिरी, हौदे कोरडे पडल्याने पाळीव प्राणी गटारांचे दूषित पाणी पिण्यास मजबूर आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असून, मानवी आरोग्यालाही याचा धोका निर्माण झाला आहे.

वनविभाग आणि पशुसंवर्धन विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. शासनाकडून मानवी वस्त्यांपुरते पाणीपुरवठा करण्याच्या योजना राबवल्या जात असल्या तरी वन्य आणि पाळीव प्राण्यांच्या पाण्याच्या गरजेकडे दुर्लक्ष झाले आहे. वन विभाग आणि ग्रामपंचायतींच्या समन्वयातून तात्पुरते कृत्रिम पाणवठे निर्माण करणे ही काळाची गरज आहे.
संपूर्ण जिल्ह्यात वन्य आणि पाळीव प्राण्यांच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता, शाश्वत उपाययोजना तातडीने राबवणं अत्यावश्यक ठरतं आहे. अन्यथा एक गंभीर पर्यावरणीय आणि जैवविविधतेचा प्रश्न उभा राहण्याची शक्यता आहे.