By संतोष पाटील
पालघर जिल्हात विक्रमगड तालुक्यात गावागावात भीषण पाणी टंचाई दिसू लागली आहे. महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. तरुणांपासून वृद्धापर्यंत सर्वानाच या टंचाईच्या झळा पोहचू लागल्या आहेत. कुठे विहिरींनी तळ गाठला तर कुठे पाणी योजना बंद पडल्या आहेत. कुटुंबासाठी लहान मुले सुद्धा पाणी आणण्यासाठी रखरखत्या उन्हात वणवण भटकत आहेत. तसेच वाडा तालुक्यातील परळी, उज्जेनी परिसर याभागात ग्रामीण भागात पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे.
जव्हार तालुक्यात जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेचा बोजवारा उडाला असल्यामुळे पिण्याचे पाणी गाव पाड्यात पोहोचलेच नाही, त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही ही ३२ गाव पाड्यांमध्ये तिव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
एप्रिल महिन्यातच १४ गावं-पाड्यांची तहाण भागवण्यासाठी ५ टँकरने दिवसाआड पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. शिवाय १८ गावांचे टंचाई प्रस्ताव जव्हार पंचायती समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे मंजुरीसाठी पडून आहेत. तालुक्यातील खरंबा, सागपाणी, रिठीपाडा, कासटवाडी, रामपूर, तळ्याचापाडा, सुळ्याचापाडा, हिरडपाडा, बांबरेपाडा, कापरीचापाडा, काळीधोंड कातकरीपाडा, नंदनमाळ या गावांना यावर्षी मार्च महिन्यापासूनच टंचाईला सुरवात झाली आहे. त्यामध्ये टंचाईग्रस्त सहा गावांमध्ये पंचायत समितीद्वारे एक दिवसाआड टॅँकरने पाणी पुरवठा सुरु आहे, तर आठ गाव पाड्यांना सुरळीत टँकर सुरू आहे.
मुंबई उपनगराच्या शेजारी लागुन असलेल्या पालघर जिल्यातील अतिदुर्गम डोंगराळ भाग असलेला विक्रमगड, जव्हार, मोखाडा तालुक्यातील बहुतांऊश भागातील आदिवासी नागरीक अजुनही जीवनातील मूलभूत गरजा पासुन वंचीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सरकारच्या मोठमोठ्या योजना व घोषणा. करोडोंचा निधी कागदावरच अस्तित्वात असुन योग्य अंमलबजावणी व व्यवस्थापना अभावी सर्व पाण्यात गेल्याचे दिसुन येत आहे.
उन्हाचा पारा चढत असल्याने अनेक भागातील विहिरीतील पाण्याची पातळी खाली गेल्याने महिलाना पाण्यासाठी रात्र जागावी लागत आहेत. विक्रमगड तालुक्यातील खुडेद ग्रामपंचायत हद्दीतील म्हसेपाडा, घोडीचापडा या गावात भीषण पाणी टंचाई आहे. म्हसेपाड्यातील महिलाना गावापासून काही अंतरावरून चढण चढून पाणी आणावे लागत असल्याने पाणी आणताना महिलाची दमछाक होते. तसेच साखरे कासपाड्यातील आदिवासीं महिलांना पाण्याच्या शोधात नदी नाल्यांच्या पात्रात खड्डे खणत वणवण फिरावे लागत असल्याचे विदारक सत्य समोर आले आहे. पाणी साठवणेसाठी देखील याभागात स्वतंत्र विहीर नसल्याने पाणी पुरवठा करण्यास ही अडचण येत आहे. कासपाड्याच्या महिलांना पाण्यासाठी नदीपात्रा खालील 2 किलोमीटर लांब असलेल्या डोंगर दऱ्या उतरून कोम पाड्याच्या विहिरीवर जावे लागत आहे. प्रशासनाने पाणी टंचाईवर तातडीने निर्णय घेऊन समस्या सोडवावी अशी अपेक्षा स्थानिक करीत आहेत.
“जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजना जव्हार तालुक्यात प्रामाणिकपणे राबवली गेली असती तर तालुक्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली नसती त्यामुळे या योजनेची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.”
— यशवंत पोटींदा, सामाजिक कार्यकर्ते जव्हार