ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिंदे गटाची ‘मैत्री वाघाशी’ बॅनरबाजी!

ठाकरे गटाच्या ‘शिवबंधन’वर थेट हल्ला

मुंबई – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबईत सदस्य नोंदणी मोहीम आक्रमकपणे सुरू केली आहे. विशेषतः पश्चिम आणि पूर्व उपनगरांत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ‘बॅनरबाजी’च्या माध्यमातून ठाकरे गटावर थेट निशाणा साधला आहे.

मुंबईतील अनेक ठिकाणी लावलेल्या बॅनरांवर एकनाथ शिंदे यांचे आकर्षक चित्र, धनुष्यबाण चिन्ह आणि मध्यभागी “मैत्री धाग्याची नाही, मैत्री वाघाशी!” असा ठळक मजकूर झळकत आहे. हे बॅनर ठाकरे गटाच्या ‘शिवबंधन’ सदस्य नोंदणी मोहिमेची अप्रत्यक्ष खिल्ली उडवतात, तसेच ‘खरी शिवसेना हीच’ असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करतात.

या बॅनरांमधून शिंदे गटाने शिवसेनेची ओळख ‘विकास, कार्यक्षमतेचा वाघ आणि खऱ्या विचारांची ताकद’ अशी दर्शवत नवीन कार्यकर्त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्नही केला आहे. या प्रकारामुळे येत्या काळात, विशेषतः मुंबईत, ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठाकरे गटाने काही महिन्यांपूर्वी ‘शिवबंधन’ मोहीम सुरू केली होती. त्याच्या प्रत्युत्तरात, शिंदे गटाने ‘मैत्री वाघाशी’ हा थेट टोला लगावत सदस्य नोंदणीला वेग दिला आहे. आतापर्यंत ठाकरे गटाचे सुमारे ७० माजी नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करीत आले असून, अलीकडेच ठाकरे गटाचे विश्वासू व मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य संजय घाडी व त्यांची पत्नी, माजी नगरसेविका संजना घाडी, यांनीही शिंदे गटात प्रवेश केला.

हे सगळे लक्षात घेता, एकनाथ शिंदे यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीला ‘अस्तित्वाची लढाई’ मानत आपला संपूर्ण पक्ष मुंबईत झोकून देण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार माजी नगरसेवक, आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना प्रचारात झोकून देण्यास सांगितले असून, त्याची सुरुवात ‘बॅनरबाजी’ने झाली आहे.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात