महाराष्ट्र ताज्या बातम्या शोध बातमी

मराठवाड्याला केंद्रात मंत्रीपद? 

Editorial illustration depicting political discussions over Union Cabinet expansion and Marathwada’s growing role in Maharashtra politics after Operation Tiger.


ऑपरेशन टायगरच्या राजकीय घडामोडींनंतर मराठवाड्यातील राजकारण पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (उबाठा) गटातील सहापैकी तीन खासदार मराठवाड्यातील असल्याने या विभागाचे राजकीय महत्त्व अधिक वाढले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील एका खासदाराला मंत्रीपद मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

दुसरीकडे पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सीबीआय विशेष न्यायालयाने आठ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या निकालामुळे खासदार ओमराजे निंबाळकर हे ऑपरेशन टायगर मोहिमेत सहभागी झाल्यानंतर खूप संतापले आहेत. त्यांनी ऑपरेशन टायगरपूर्वीच या हत्याकांड प्रकरणात त्यांना केंद्राकडून जे अपेक्षित होते, तो निरोप अगोदरच दिला होता. परंतु सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे त्यांना धक्काच बसला. आता खासदार ओमराजे निंबाळकर यांना मंत्रिपदाचा शब्द केंद्रातून मिळाला असल्याची चर्चा मराठवाड्यात रंगलेली आहे.

राजकीय चर्चेनुसारराज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे नाव संभाव्य मंत्रिपदासाठी आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यासोबत मराठवाड्यातील एका खासदाराला मंत्रीपदाची चर्चा रंगात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. त्या विस्तारामध्ये मराठवाड्यातील या दोन पैकी एका खासदाराचा समावेश होणार असल्याचे म्हटले जात आहे. 

महाराष्ट्राचे राजकारण सदैव मराठवाड्याभोवती फिरत असते. उद्धव ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग पूर्वी मराठवाड्यात होता. परंतु आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. पंचायत समितीच्या राजकारणापासून दिल्लीच्या राजकारणापर्यंत केवळ सत्ताधाऱ्यांच्या मागे – पुढे फिरणाऱ्यांची चलती आहे. हे ओळखून मराठवाड्यातील आजी-माजी खासदार तसेच आमदार देखील सत्ताधाऱ्यांच्या गोटात सामील होत आहेत. 

उद्याचे उद्या पाहूयात, येणारी निवडणूक पाहता येईल, आजचे काय ? हा दृष्टिकोन समोर ठेवून प्रत्येक राजकारणी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेत आहे. याच दृष्टिकोनातून मराठवाड्यातील तीन खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून सत्ताधारी एकनाथ शिंदे यांची वाट धरली. मराठवाड्यातील ज्या तीन खासदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली त्यामध्ये त्यांचा मोठा राजकीय फायदा होईल असे म्हटले जात आहे.  

राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसोबत राहिल्याने स्वतःच्या मतदारसंघातील कामे होतील असा या खासदारांना विश्वास आहे. दुसरीकडे केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत त्यांचे हात बळकट केल्याने दिल्लींश्वरांचा आशीर्वाद मिळेल, हे त्यामागचे खरे गणित आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. महाराष्ट्रातील अनेकांच्या नजरा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लागलेल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागेल हे औत्सुक्याचे ठरणार आहे. मराठवाड्यातून एका खासदाराला केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्यातून केंद्रात कोण जाणार याची चर्चा मराठवाड्यात रंगलेली आहे.

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना सीबीआय विशेष न्यायालयाकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी त्यांना अपेक्षित निकाल न आल्याने ते एकनाथ शिंदे यांच्यावर किंबहुना केंद्रावर नाराज आहेत. 

राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी दिली जाऊ शकते. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

निंबाळकर गोटातून अशी चर्चा पुढे आल्याने परभणीचे खासदार बंडु जाधव यांचे मंत्रिपद हुकणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात सहा खासदार जमवत असताना परभणीचे खासदार बंडु जाधव यांनी इतर खासदारांची फिल्डिंग लावण्यासाठी चांगलीच मदत केली होती असे म्हटले जाते. त्या मदतीपोटी सुरुवातीला त्यांना मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते, असे सांगितले जाते. परंतु आता त्यांना मंत्रीपदातून बाजूला ठेवून खासदार ओमराजे निंबाळकर यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगितले जाते.

ऑपरेशन टायगर प्रकरणी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पाठिंबाच्या पत्रावर उशिरा स्वाक्षरी केली. प्रत्यक्षात सीबीआय विशेष न्यायालयाचा निकाल व त्यांचा पक्षप्रवेश यामध्ये दोन दिवसांचा फरक होता. त्यामुळे त्यांच्या केंद्राकडून वेगळ्या अपेक्षा होत्या. परंतु त्या अपेक्षा फोल ठरल्याने त्यांची राजकीय खदखद वाढली आहे.

मराठवाड्यातील तीन खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर राजकीय झोपेतून जागे झालेले उबाठाचे उरलेसुरले नेते हे मराठवाड्यात अवतरले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत भाषण करून स्वतःचे समाधान करून घेतले. आपल्या भाषणात शिव्या घातल्या की टाळ्या मिळतात हे माहीत असल्याने त्यांनी आपले भाषण त्याच दिशेने चालू ठेवले. मराठवाड्यात त्यांच्या भाषणाला टाळ्या तर मिळाल्या परंतु त्यांना कसलाही राजकीय लाभ त्यामधून झाला नाही किंवा भविष्यात होणार नाही, असेही मराठवाड्यातील त्यांच्या राजकीय सभांमधून स्पष्ट झाले.

एका आरोग्य शिबिराच्या निमित्ताने खासदार श्रीकांत शिंदे हे काल नांदेड जिल्ह्यातील सारखणी येथे आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील काही कार्यकर्त्यांनी खासदार शिंदे यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविले. ही सर्व राजकीय खदखद पूर्वीच व्हायला होती. परंतु ज्या ठिकाणी त्या पक्षाचे नेतेच लक्ष द्यायला तयार नाहीत तेथे कार्यकर्ते तरी काय करणार? राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्यावर विश्वास ठेवून पक्षात आलेल्या आमदार व खासदारांची विशेष काळजी घेतात. त्यांनी लगेच या घटनेची दखल घेतली. स्वतःच्या मुलासोबत केंद्रीय मंत्रिमंडळात मराठवाड्याला न्याय दिला जाईल असा शब्द त्यांनी या पक्षप्रवेश प्रसंगी खासदारांना दिला होता. 

त्यामुळे मराठवाड्यातील एका खासदाराला केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळू शकते, अशी अपेक्षा आणि चर्चा राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. अंतिम निर्णय मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारावर अवलंबून असेल.

Dr Abhaykumar Dandage

Dr Abhaykumar Dandage

About Author

डॉ अभयकुमार दांडगे (Dr Abhaykumar Dandge) हे नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार असून मराठवाडा हा त्यांचा लेखनाचा विषय आहे. Dr Abhaykumar Dandge — writer and analyst on Marathwada’s agriculture, rural economy and regional politics

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात