मुंबई
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाइव्हदरम्यान गोळ्या झाडण्यात आल्या, यात त्यांचा मृत्यू झाला आहे. मोरिश नोरान्हो याने त्यांना बोलावून हत्या केली. यानंतर मोरिशने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे.
मात्र त्याने इतकं टोकाचं पाऊल का उचललं, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात अनेक दावे केले जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी मोरिशच्या पत्नीची चौकशी केली. तिच्याकडून पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. मोरिश राजकीय क्षेत्रात येऊ इच्छित होता. मात्र बलात्कार आणि आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी मोरिसला तुरुंगात जावं लागलं. यामागे अभिषेक घोसाळकरांचा काही संबंध असल्याचंही सांगितलं जात आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो अभिषेक यांच्यावर डूख धरून होता. अभिषेकला मी सोडणार नाही, असं तो बायकोला वारंवार म्हणायचा, अशी माहिती समोर आली आहे.
त्यामुळे सूड उगवण्यासाठी त्याने अभिषेकच्या हत्येचा प्लान आखला. आधी त्याने अभिषेकसोबत मैत्री केली. आधीचे वितुष्ट संपवण्यासाठी त्याने अभिषेकला फोन केला. फेसबुक लाइव्हमध्येही दोघं एकत्र येऊन काम करणार असल्याचं म्हणत होते. यावेळी त्याने हळदी कुंकू आणि साडीवाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी त्याने अभिषेक यांना बोलावलं होतं. मात्र फेसबुक लाइव्ह संपताच त्याने अभिषेक यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती आहे.
मॉरीसची गुन्हेगारी पार्श्वभूमी
मॉरीस हा अट्टल गुन्हेगार होता असं सांगितलं जात आहे. त्याच्यावर एका महिलेवर बलात्कार केल्याचा आणि तिला लाखो रुपयांना फसवल्याचा आरोप आहे. त्यामुळे तो मधल्या काळात तुरुंगातही होता. मॉरीसला नेता बनायची हौसही होती. त्यामुळे त्याने महापालिकेची निवडणूकही लढवली होती असं सांगितलं जातं. तो स्वत:ला समाजसेवक म्हणवून घेत असल्याचंही सांगितलं जात आहे.