मुंबई: नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राउळगाव येथे असलेल्या एसबीएल एनर्जी लिमिटेडच्या स्फोटके निर्मिती कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात २२ कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून आज विधानसभेत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. विरोधी पक्षांनी या घटनेला गरीब कामगारांचे हत्याकांड असल्याचा आरोप करत दोषींवर कलम ३०२ अंतर्गत गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. कामगारमंत्र्यांचे उत्तर समाधानकारक नसल्याचा आरोप करत विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला.
भाजप सदस्य Atul Bhatkhalkar यांच्यासह दहा सदस्यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते Nana Patole यांनी केवळ अहवाल मागवून प्रश्न सुटणार नाही, हा कामगारांच्या सुरक्षेचा गंभीर मुद्दा असल्याचे सांगत जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे Jayant Patil यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून निलंबन करण्याची मागणी केली. सदस्य Charansingh Thakur यांनी स्फोटक कारखान्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करत संबंधित कंपन्या व अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्याची मागणी केली.
काँग्रेस नेते Vijay Wadettiwar यांनी या प्रकरणावर स्वतंत्र चर्चा व्हावी, अशी मागणी करत तपासात कारखान्यातील नऊ सुरक्षा त्रुटी उघड झाल्याचा दावा केला. तसेच सदोष मनुष्यवधाऐवजी कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली. सदस्य Sameer Kunawar यांनी स्फोटक कारखान्यांतील अपघातांमध्ये दरवर्षी अनेक कामगार मृत्युमुखी पडतात, जबाबदारी निश्चित करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
उत्तर देताना कामगारमंत्री Akash Fundkar यांनी सांगितले की, स्फोटक कारखान्यांमध्ये अपघाताची शक्यता कायम असते. संबंधित कारखान्याची सुरक्षा तपासणी वेळोवेळी करण्यात आली होती. या घटनेची विभागीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून कारखान्याला क्लोजर नोटीस देण्यात आली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायद्यात अधिक कठोर तरतुदी करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावरही विरोधी सदस्यांचे समाधान झाले नाही. जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला.

