Twitter : @NalavadeAnant
मुंबई
मराठी माणूस या मराठी भूमीत जगला आणि टिकला पाहिजे, अशी सडेतोड भूमिका मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समीर भुजबळ यांनी शुक्रवारी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली.
मुलुंडमध्ये दोन दिवसांपूर्वी मराठी माणसांना घर नाकारण्याच्या मुद्यावर पत्रकारांनी समीर भुजबळ यांना प्रश्न केला असता ते म्हणाले, मुंबई शहरात वेगवेगळ्या समाजाचे लोक राहत असले तरी मराठी भाषिक वर्ग जास्त आहे. या शहरात आजवर कोणत्याही जाती-धर्मात भेदभाव झालेला नाही, तो यापुढेही होता कामा नये, असे स्पष्ट मतही भुजबळ यांनी मांडले.
माजी आमदार रमेश कदम यांनी छगन भुजबळ यांच्यावर केलेल्या वक्तव्याचे खंडन करत रमेश कदम हे केवळ प्रसिद्धीसाठी वक्तव्य करत असल्याचे समीर भुजबळ म्हणाले. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लागण्यासाठी होणाऱ्या बैठकीतून निश्चित मार्ग निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आपले हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येण्याची अपेक्षाही भुजबळ यांनी व्यक्त केली.
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक बळकटीसाठी पुढील आठवड्यापासून विभागवार बैठकांचे आयोजन करून जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष अशा रिक्त पदांची नियुक्ती करण्यात येईल. मुंबईत सर्वसामान्यांपासून ते उच्चभ्रू वर्गापर्यंत सर्वांचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांची एक मजबूत फळी उभी केली जाणार असल्याची माहितीही भुजबळ यांनी दिली.