नागपूर : मागील विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघांतील पराभूत उमेदवारांनी महायुतीच्या विजयी उमेदवारांविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निवडणूक याचिका दाखल केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, न्यायालयाने गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावले असून, त्यांना ८ मेपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांनी फडणवीस यांच्या विजयाला आव्हान दिले आहे. बुधवारी न्यायालयाने भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आमदार मनोज कायंदे, आणि भाजपचेच आमदार देवराव भोंगळे यांनाही समन्स बजावले होते.
गुरुवारीही भाजपचे आमदार मोहन मते (दक्षिण नागपूर) आणि चिमूरचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांनाही समन्स बजावण्यात आले. मते यांच्याविरुद्ध काँग्रेसचे गिरीश पांडव, तर भांगडिया यांच्याविरुद्ध काँग्रेसचे सतीष राजूरकर यांनी याचिका दाखल केली आहे.
या याचिकांमध्ये ईव्हीएम वापराबाबत निवडणूक आयोगाने आवश्यक अधिसूचना न काढता निवडणूक घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच पराभूत उमेदवारांना सीसीटीव्ही फुटेज आणि फॉर्म क्र. १७ देण्यात आले नाहीत, व्हीव्हीपॅट मोजणी न झाल्याचे मुद्देही उपस्थित करण्यात आले आहेत.
या याचिकांवर न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने यामध्ये प्रतिवादी म्हणून निवडणूक आयोगाची नावे वगळून केवळ विजयी उमेदवारांनाच समन्स बजावले आहेत.
फडणवीस यांना ८ मे, मोहन मते यांना ६ मे आणि बंटी भांगडिया यांना ८ मेपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचिकाकर्त्यांचे प्रतिनिधित्व ॲड. आकाश मून यांनी केले.