मनसेचा प्रयत्न केवळ स्वार्थासाठी – संजय निरुपम यांची सडकून टीका
मुंबई : “महाराष्ट्राच्या हिताचे केवळ मुखवटे घालून राजकारण करणाऱ्या उबाठा गट आणि मनसे या दोन्ही पक्षांना राज्यातील जनतेने पुन्हा एकदा साफ नाकारले आहे. हे दोन्ही पक्ष आता राजकीयदृष्ट्या संपलेले असून, स्वार्थ आणि अस्तित्व टिकवण्यासाठी केलेले प्रयत्न हास्यास्पद आहेत,” अशी सडकून टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना निरुपम म्हणाले की, “उबाठा गटाने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा त्याग करून स्वतःच्या कुटुंबासाठी आणि सत्तेसाठी हिंदुत्वाशी गद्दारी केली. काँग्रेससोबत जाऊन त्यांनी आपली विचारधारा संपवली. त्यामुळेच जनतेने त्यांच्यावरचा विश्वास काढून घेतला आहे.”
राज ठाकरे व उबाठा यांची युती ‘शून्य + शून्य = शून्य’
“राज ठाकरे यांच्या मनसेला विधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. उबाठा गटाचेही हेच चित्र आहे. दोन शून्य एकत्र आले तरी उत्तर शून्यच राहते. व्यावसायिक भाषेत सांगायचं झालं, तर दोन तोट्यातील कंपन्या एकत्र आल्या तरी त्यातून नफ्यातील कंपनी निर्माण होत नाही,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
ढोंगी महाराष्ट्र हित?
निरुपम पुढे म्हणाले, “या तथाकथित ‘महाराष्ट्र हित’वाद्यांनी गेल्या काही वर्षांत काय केले हे जनतेला ठाऊक आहे. एका पक्षाने मशिदींवरील भोंगे काढण्याचा एककलमी अजेंडा राबवला. दुसऱ्या पक्षाने वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करून मुस्लिम तुष्टीकरणाचा प्रयत्न केला. अशा दुटप्पी भूमिका घेणारे महाराष्ट्राच्या हिताचे काय रक्षण करणार?”
’शिंदे हेच बाळासाहेबांचे खरे विचारवारस’
“आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिन्ही नेते महाराष्ट्राच्या समग्र हितासाठी झटत आहेत. ज्यावेळी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली गेली होती, त्यावेळी शिंदे यांनी ऐतिहासिक निर्णय घेऊन शिवसेना आणि तिच्या विचारधारेचा पाडाव होऊ दिला नाही. बाळासाहेबांचे केवळ रक्ताचे नव्हे तर विचारांचेही खरे वारस आज एकनाथ शिंदेच आहेत,” असे संजय निरुपम यांनी स्पष्ट केले.