राज ठाकरेंच्या आवाहनावर प्रतिक्रिया; ‘मराठीपण’ ही केवळ भावनिक नारा न राहावा – कपिल पाटील
मुंबई : “ठाकरे नावाचं गारुड महाराष्ट्राच्या समाजमनावर आहे हे खरेच, पण दोन भावांतला वाद मिटला म्हणून मराठी माणसाचे प्रश्न सुटणार आहेत का?” असा थेट सवाल शिक्षणतज्ज्ञ आणि माजी आमदार कपिल पाटील यांनी उपस्थित केला आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सर्व मराठी जनतेला एकत्र येण्याचे आवाहन केल्यानंतर पाटील यांनी मराठी समाजाच्या प्रश्नांवर खोलवर भाष्य करत सडेतोड भूमिका मांडली आहे.
कपिल पाटील म्हणाले, “मुंबईतून हाकलला गेलेला मराठी माणूस – बदलापूर, नालासोपारा, पनवेलला विस्थापित झालेला – पुन्हा मुंबईत येणार आहे का? गिरणी कामगारांच्या वारसांना घर मिळणार आहे का? बीएमसीची हॉस्पिटलं गेल्या २५ वर्षांत का बरी झाली नाहीत?”
यासोबतच त्यांनी बीएमसीमधील कंत्राटं, मराठी तरुणांना मिळणाऱ्या संधी, आणि मराठी माणसाचे खऱ्या अर्थाने होणारे राजकीय प्रतिनिधित्व यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“मराठी माणूस म्हणजे फक्त ठाकरे आणि पवारच का?” असा प्रश्न उपस्थित करत कपिल पाटील पुढे म्हणाले, “निवडणुकीत जनमान्यता मिळालेले बहुजनांचे प्रतिनिधी – एकनाथ शिंदे, नारायण राणे, छगन भुजबळ हे मूळ शिवसैनिकच आहेत. मग त्यांना मराठी राजकारणात स्थान का नाही?”
ते पुढे म्हणाले की, मराठी भाषिकांचा परिघ फक्त एका विशिष्ट वर्गापुरता मर्यादित राहता कामा नये. “मराठी बोलणारा मुसलमान, वसईचा ख्रिश्चन, मराठा समाजातील गरजू, आंबेडकरी बौद्ध – हे सारे मराठीच आहेत, पण त्यांच्या प्रश्नांचं काय?”
तामिळनाडूचा दाखला देत पाटील म्हणाले, “तेथे हिंदूच राहतात, पण त्यांनी हिंदुत्ववादी राजकारणाला थारा दिला नाही. म्हणून तिथलं सांस्कृतिक आणि भाषिक अस्मितावाद टिकून आहे. महाराष्ट्रात मात्र हिंदुत्वाच्या राजकारणाने मराठी अस्मिता दुर्बळ केली आहे.”
“मराठी तरुणांची डोकी फोडणाऱ्या भावना पेटवण्यापेक्षा त्यांना रोजगार, हक्क आणि स्वाभिमान देणाऱ्या राजकारणाची गरज आहे,” असा सज्जड इशारा देत पाटील म्हणाले की, “एकत्र येणं स्वागतार्ह आहे, पण केवळ घोषणांपुरते नको – प्रश्नांची उत्तरंही मिळाली पाहिजेत.”