३० मेपर्यंत उरलेले नेते राष्ट्रवादी वा शिंदे गटात जाण्याची शक्यता!
महाड: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले. त्यानंतर अनेक माजी आमदार, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व पदाधिकारी सत्ताधारी शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याकडे वळले. आता ३० मे पर्यंत उरलेसुरले काही प्रमुख पदाधिकारीही पक्षत्याग करून दुसऱ्या गटात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
केवळ गुहागर विधानसभा मतदारसंघात भास्कर जाधव यांना यश मिळाल्याचा अपवाद वगळता संपूर्ण कोकणात पक्षाची अवस्था खालावलेली दिसत आहे. याला कारणीभूत ठरली आहेत मातोश्रीवरून घेण्यात आलेल्या चुकीच्या नियुक्त्या, दुर्लक्षित निष्ठावंत शिवसैनिक, आणि पक्षाच्या वाढीऐवजी निर्माण झालेली गोंधळाची स्थिती.
सत्ताधाऱ्यांचा दबाव आणि प्रलोभनांचा मारा
शिंदे गट, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि भाजप या सत्ताधारी गटांकडून पदाधिकाऱ्यांना प्रचंड आर्थिक प्रलोभनं, सत्ता व पदांची आश्वासने दिली जात आहेत. अनेक पराभूत उमेदवार, माजी आमदार, जिल्हा व तालुकाप्रमुख यांच्यावर याचा परिणाम झाला आहे. परिणामी सामान्य शाखाप्रमुख व कार्यकर्ते देखील गोंधळात सापडले आहेत. यावर मातोश्रीवरून फारशी दखल घेतली जात नसल्याची भावना तळागाळातील शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली आहे.
दक्षिण रायगडचा बुरुज उधळतोय?
दक्षिण रायगडमध्ये रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ आणखी काही नेत्यांचे पक्षांतर होण्याची शक्यता आहे. हेच चित्र रत्नागिरी व सिंधुदुर्गातही दिसत आहे.
चुकीच्या नियुक्त्यांचा फटका
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेतही अपयश आल्यानंतर कोकणातील संघटन रचना बळकट करण्याऐवजी मातोश्रीवरून केलेल्या नवनियुक्त्या व संपर्क प्रमुखांच्या निर्णयांमुळे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले. अनेक जेष्ठ शिवसैनिकांचे अनुभव व मार्गदर्शन दुर्लक्षित झाले.
युतीचं भविष्य आणि निष्ठावंतांची अपेक्षा
सध्या शिवसैनिकांमध्ये अशी चर्चा आहे की, राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यात युती झाली, तरच निष्ठावंतांना नवसंजीवनी मिळू शकते. अन्यथा सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या पक्षफोडीला थोपवणं कठीण होईल.
कोकणात संपर्क अभियान, पण…?
पक्षाकडून लवकरच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात संपर्क अभियान राबवले जाणार आहे. मात्र त्याआधीच स्थानिक नेतृत्वाने निष्ठावंतांच्या भावना समजून घेणं, आर्थिक पाठबळ देणं, आणि त्यांच्या सल्ल्याला गांभीर्याने घेणं अत्यावश्यक आहे. अन्यथा बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेला पक्ष कोकणात आणखी खिळखिळा होण्याची भीती शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे.