मुंबई : पश्चिम बंगालमधील राजकीय घडामोडींवर भाष्य करत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष Prakash Ambedkar यांनी मुख्यमंत्री Mamata Banerjee यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावरील पोस्टद्वारे त्यांनी “जनमताचा आदर राखत राज्यघटनेचे पालन करावे” असे म्हटले असून, त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आम्ही विविध माध्यमांतून ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भाजपच्या विषारी डावपेचांबाबत वेळोवेळी सावध केले होते. मात्र, त्यांनी त्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले.” पश्चिम बंगालच्या जनतेने सध्याच्या परिस्थितीसाठी ममता बॅनर्जी यांना जनादेश दिलेला नसल्याचा दावा करत त्यांनी जनमताचा आदर राखण्याचे आवाहन केले.
राज्यघटनेचा संदर्भ देताना आंबेडकर यांनी पुढे म्हटले की, संक्रमणकालीन काळजीवाहू व्यवस्थेचा कालावधी संपल्यानंतर मुख्यमंत्रीपदी कायम राहण्यासाठी कोणताही थेट घटनात्मक पर्याय उपलब्ध नसल्याचे त्यांचे मत आहे. त्यामुळे लोकशाही मूल्ये आणि संविधानिक प्रक्रियेचा सन्मान राखण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी तातडीने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
भाजपच्या रणनीतीला वेळीच प्रतिसाद न दिल्यामुळे आजची परिस्थिती निर्माण झाल्याचे संकेत देत आंबेडकर यांनी अप्रत्यक्षपणे तृणमूल काँग्रेसच्या राजकीय भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

