महाड: किल्ले रायगडावरील विकास कामांच्या नावाखाली मुक्या प्राण्यांवर होत असलेल्या अमानुष अत्याचाराचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गडावर बांधकाम साहित्य वाहून नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गाढवांचे हाल होत असून, मृत झालेल्या गाढवांना कोंझर घाटात उघड्यावर फेकून दिल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
महाड–रायगड मार्गावरील जुन्या कोंझर घाटात चार ते सहा गाढवांचे मृतदेह रस्त्यालगतच्या दरीत टाकून दिल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. स्थानिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर हा प्रकार उघड झाला.
किल्ले रायगडावर सध्या मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू असून, वाळू, दगड आणि इतर बांधकाम साहित्य गडावर नेण्यासाठी शेकडो गाढवांचा वापर केला जात आहे. उभ्या चढाच्या पायऱ्या आणि कठीण भूप्रदेशामुळे या मुक्या प्राण्यांच्या पाठीवर मोठ्या प्रमाणावर ओझे लादले जाते.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गाढवांना पुरेसे अन्न-पाणी दिले जात नाही. उन्हात बांधून ठेवले जाते आणि दिवस-रात्र काम करून घेतले जाते. अनेक वेळा गड चढताना त्यांच्या तोंडातून फेस येत असूनही त्यांना विश्रांती दिली जात नाही.
यापूर्वीही गाढवांच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. मात्र ठेकेदारांकडून कोणतीही जबाबदारी घेतली जात नसून, मृत प्राण्यांना सन्मानाने विल्हेवाट लावण्याऐवजी उघड्यावर टाकले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
रायगडच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या प्राण्यांवर होणारी ही क्रूरता संतापजनक असून, संबंधित ठेकेदारांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.


Jefferson Lorent
April 12, 2026I think you have noted some very interesting points, thankyou for the post.