मुंबई: मुंबईतील पंचतारांकित रुग्णालयांनी शासकीय सवलतींचा लाभ घेत असूनही गरीब रुग्णांसाठी राखीव खाटा उपलब्ध करून देण्याच्या अटींचे पालन होत नसल्याचा मुद्दा भाजप आमदार चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. नियमभंग करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
चित्रा वाघ यांनी शासनाला दोन प्रमुख प्रश्न उपस्थित केले. महापालिकेकडून सवलतीच्या दरात जमीन, एफएसआय आणि इतर शासकीय लाभ मिळाल्यानंतरही अटींचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांचे परवाने आणि सवलती रद्द करण्यात येणार का, तसेच गरीब रुग्णांना राखीव खाटा नाकारल्याप्रकरणी संबंधित रुग्णालयांच्या व्यवस्थापनाविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार का, असा सवाल त्यांनी केला.
केवळ नोटिसा देऊन प्रश्न सुटणार नाहीत. गरीब रुग्णांना न्याय मिळाला पाहिजे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी सभागृहात केली.
यावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विशेष तपास मोहीम राबविण्यात येईल, नियमभंग करणाऱ्या रुग्णालयांवर आवश्यक ती कारवाई केली जाईल तसेच शहर व जिल्हास्तरावर गरीब रुग्णांसाठी उपलब्ध खाटांची माहिती देणारी डॅशबोर्ड प्रणाली विकसित करण्याच्या सूचना देण्यात येतील, असे आश्वासन दिले.

