मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ६५ इमारतींसंदर्भात सुरू असलेल्या वादावर सकारात्मक तोडगा काढला जाईल आणि एकाही रहिवाशाला बेघर होऊ दिले जाणार नाही, अशी ठाम भूमिका भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी स्पष्ट केली.
महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक
या महत्त्वाच्या विषयावर आज मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीला आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त तसेच ठाणे, रायगड, पालघर आणि मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला.
“रहिवाशांची घरे त्यांचा हक्क आहे” – आमदार चव्हाण
बैठकीत बोलताना आमदार रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले की, या ६५ इमारतींमधील रहिवाशांनी आपली घरे कर्ज काढून किंवा आयुष्याची पुंजी गुंतवून घेतली आहेत. त्यामुळे त्यांचे हक्काचे छप्पर त्यांच्या डोक्यावर राहिले पाहिजे. उल्हासनगरमध्ये यासारख्या प्रकरणावर सरकारने सकारात्मक तोडगा काढला होता, त्याच धर्तीवर येथेही निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
चार दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेतली असून, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली येत्या चार दिवसांत चारही संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल, असे आश्वासन दिले.
तसेच या बैठकीत सविस्तर अहवाल सादर करून प्रस्ताव तयार करण्यात येईल आणि त्यानंतर हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर केला जाईल, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
हजारो रहिवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा
या निर्णयामुळे कल्याण-डोंबिवलीतील हजारो रहिवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. सरकार सकारात्मक पावले उचलत असल्याने लवकरच या वादावर अंतिम तोडगा निघेल, अशी नागरिकांची आशा आहे.